रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

लेख

*पाल्याचे करिअर : स्वप्न की स्वप्नांचे ओझे!*

        आजकाल 'पाल्याचे करिअर' हा शब्द जिथे-तिथे परवलीचा बनला आहे.जो-तो आपल्या स्वतःच्या,नि पालक आपल्या पाल्याच्या करिअर चीच चर्चा करताना आढळतात.करिअरची नेमकी व्याख्या काय? याचे उत्तर कोणालाच नेमकेपणाने सांगता येते हे शक्य नाही.केवळ भौतिक सुख-सुविधांची मुबलक प्रमाणात पुर्तता करता यावी यास्तव मोठ्या पगाराची नोकरी अथवा भरपूर अर्थार्जन करता येणारा व्यावसाय करता येणे नि त्यादिशेने वाटचाल करण्यास उपयुक्त मार्गाच्या दिशेने जाणे म्हणजे करिअर! व त्यासाठी शिक्षणात जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी स्व-क्षमतेची,अभिरूचीची किंवा पाल्याच्या क्षमतेची,त्याच्या अभिरुचीची जाणीव न ठेवता वरील मृगजळामागे दिशाहीन  धावत राहणे हेच करिअर की काय ही शंका पालक नि पाल्य दोहोंच्या वर्तनातून आज पदोपदी पाहायला मीळते.
         खरेतर स्वतःचे करिअर नेमके कोणते नि ते कसे घडवावे याचा नेमकेपणाने विचार करण्याची संधी स्वतः पाल्यास आहे हे चित्र फार दुर्मिळ ठिकाणी पाहायला मिळते.बहुतांश कुटुंबात पाल्याच्या करिअरची दिशा ही पालकच ठरवतात नि त्याच्या पुर्ततेस्तव पाल्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादताना दिसतात.आपणांस जे लाभले नाही ते माझ्या मुलांना मिळाले पाहिजे या पालकाच्या मानसिकतेला बहुतेक करून भौतिक सुखाचीच किनार असते.या खोट्या भ्रमात राहून पालक आपल्या पाल्यास या जिवघेण्या स्पर्धेत ऊर फुटेस्तोवर पळण्यास भाग पाडतो.नि पाल्यही आपल्या पालकाच्या स्वप्नाखातर प्रचंड मानसिक दबावात स्वतःला रेटण्याचा प्रयास करतो. हा त्याचा प्रयास बहुतेकवेळा अपयशी किंवा असमाधानी ठरतो त्यातून त्याच्या स्वतःच्या नि पालकांच्या वाट्याला निराशा येते.या नैराश्यतेतून बाहेर पडणे ज्या मुलांना जमत नाही ती मुले व्यसनाधीन होणे किंवा आत्महत्त्येच्या मार्गाचा स्वीकार करतात की जो पूर्णतः योग्य नाही.
             आपल्या पाल्याने त्याच्या आयुष्यात पुढे जाऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे नि त्यासाठी त्याने विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यावा ,12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरींग प्रवेशासाठीच्या प्रवेशपरिक्षेत यश मिळवावेच या हट्टाहसाने पेटलेला पालक आपल्या पाल्याच्या; त्याच्या स्वप्नांचा,विचारांचा,इच्छेचा क्वचितही विचार करताना दिसत नाही.याचे परिणाम व्हायचे तेच होतात. अनिच्छेने आत्मप्रेरणेशिवाय  केलेले कोणतेही कार्य कधीच यशस्वी होत नाही . यातून जीवनात तणावाची स्थिती निर्माण होते नि तणावपूर्ण  मनस्थितीत विचारांचा लोप होतो.यातून मुले बंडखोर,चिडचिडी,एकलकोंडी,व्यसनी होण्याचा संभव अधिक निर्माण होतो.काही प्रसंगात पालक व पाल्याचे याबाबतीत योग्य समायोजन नाही झाले तर तणावग्रस्त मुले आत्महत्त्या करतात.
               आजकाल तर पालक आपल्या पाल्याच्या करिअर ची दिशा त्याच्या जन्मापुर्वीच ठरवत आहे हे खरेच भयाण वास्तव आहे.त्यादिशेने हे पालक त्याची शाळानिश्चीती करणे,ट्यूशन निश्चीती करणे,विविध संस्कारशिबिरांना? त्यास धाडणे,सतत त्याच्या शिक्षणाबाबत जागरूक? रहाणे, हे असले अजब प्रयास करून पाल्याच्या करिअरचे स्वप्न स्वतःच पाहतात की जे स्वतःपाल्याच्या दृष्टिआड असते. नि अशा अदृश्य स्वप्नांमागे धावण्याचा,धावण्यास लावण्याचा अकल्पित प्रकार पालक करतांना दिसतात.जीवनात स्वबळावर,स्वसमजुतीने आचंबित करणारे यश संपादन करून आपले करिअर घडविलेली अनेक यशस्वी माणसांची चरित्रे पाहता त्यांच्या जडण-घडणीत त्यांचे स्वतःचे विचार,प्रयत्न असल्याचे दिसते.या यशस्वी माणसांच्या पालकांनी त्यांच्यावर कोणत्याही स्वतःच्या अपेक्षांचे ओझे,बंधन लादल्याचा कुठेही उल्लेख नाही. तरीही आजचा सुजाण पालक याच्या विपरीत वागताना दिसतो.आजकाल एखादया घरातील पाल्य 10वी किंवा 12 वी स आहे किंवा एखादी प्रवेशपरीक्षा देणार आहे हे त्या घरातील आई-वडिलांच्या तणावग्रस्त चेह-यांना पाहून कोणासही सहज लक्षात येते.आपल्या पाल्यांच्या करिअरची स्वप्ने स्वतः रेखाटून त्यात पाल्यास आपल्याच अपेक्षेचे रंग भरायास सांगणे नि उत्तम कलाकृतीची अपेक्षा करणे योग्य ठरते का? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत पालक मुल घडविणे म्हणजे फुलास त्याच्याप्रमाणे उमलू देणे त्याचा रंग ,रूप ,आकार, गंध त्याला हवा तो धारण करू देणे,त्यावर आपल्या अपेक्षांचे बंधन न लादता  आपण केवळ योग्य तितके ,योग्य ते खत-पाणी देणे हे घडत नाही तोपर्यंत अनुत्तरितच असेल.

  @  -----स्वलिखित
श्री.सुनील विलास अस्वले.
मु.पो.वडणगे,ता.करवीर, जि.कोल्हापूर
पदवीधर अध्यापक वि.मं.पोहाळे/आळते,
ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर.
मोबा.9049211785
sunilaswale80@gmail.com
suvarnvilas.blogspot.com

1 टिप्पणी:

  1. सर आपल्या मताशी सहमत आहोत पण केवळ पालक आणि विद्यार्थी याला जबाबदार नसून आपली शिक्षण व्यवस्थाहीअसे घडण्यास कारणीभूत आहे

    उत्तर द्याहटवा