सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

नादचारोळी

[7/26, 12:01 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): ***----* चिञशलाका स्पर्धा*---*
         भाग--13वा

संचारली विरश्री रक्तात तुमच्या
घोट घेतला नरडीचा शत्रुच्या
विजयपथ तो दृष्टिपथास आला
प्रणाम आमचा शौर्याला तुमच्या
------सुवर्णविलास.
[8/2, 11:54 AM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): **स्पर्धेसाठी**

अथांग या सागरासवे
गहिरे नाते तुझे नि माझे
आयुष्याच्या या हिंदोळ्यावर
मना ओढ सख्या तुझीच  असे.

----- सुवर्णविलास.
[8/3, 1:53 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास):
काळजावरी घाव घालीत
काळरात्र ती आली अशी
कोसळला पुल असा हा
भयाण अशी ही  नियती कशी?
(स्पर्धा नको ,संवेदना महत्त्वाच्या.)
[8/4, 10:51 AM] सुनील अस्वले(सुवर्णविलास):
साहित्य दर्पण आयोजित ,
नाद चारोळी स्पर्धेसाठी.

नीलांबरी या रविराजाची स्वारी
अकस्मात येई पहा श्रावणसरी
करीत सप्तरंगांची उधळण नभी
अवतरला श्रावण पहा धरतीवरी.

सुवर्णविलास(श्री.सुनील विलास अस्वले) 9049211785
[8/4, 2:16 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): स्वरचित चारोळी...

अंगावर लेऊनि हिरवा शालू
पहा कशी ही धरित्री सजली
श्रावण सरी करती अभिषेक
हळूच पहा ती बाला हसली.

---सुवर्णविलास.
[8/9, 3:37 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): चित्रशलाका स्पर्धेसाठी
***********************
अथांग दर्याच्या किनारी
साकारले स्वप्न रेतीत मनाचे
साक्ष तयाचा कळस देई
उज्ज्वल भविष्य निर्मिकाचे.
-----------------------------------------
----सुवर्णविलास (40)
[8/9, 9:35 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): हाती घेवूनी मशाल क्रांतिची,
दिली आहुती सर्वस्वाची,
मुक्त करण्या भारतमाता ,
अवघा सारा देश एकवटला.

बलिदाने या इतिहास घडला,
स्वतंत्र झाली भारतमाता,
स्मरण करीत तव बलिदानाचे,
वंदन करुया भारतभूला.
------ सुवर्णविलास.
[8/11, 3:20 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नाद चारोळी स्पर्धेस* 👉�

सासरी जाता लेक लाडकी
गहिवर दाटला माय-बापाच्या मनी
आसवातुन ओघळे प्रीत मनाची
हुंदका तो होई अनावरी.

---सुवर्णविलास (40)
9049211785
[8/11, 3:42 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): असंख्य वेदना या जीवनी
परी प्रीत मी केली तयांवरी
नयनी न आले अश्रु कधी
हुंदका दाटला जरी उरी.

स्पर्धेसाठी *नाही*
[8/11, 5:53 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): माय-बापाच्या प्रीतिचा
हुंकार का नाही जाणवला तुला
हुंदक्याला आज हुंदका आला
कोसळलास असा कसा रे पुला.
----सुवर्णविलास (40)

स्पर्धेस *नाही*
[8/11, 10:12 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): करून बहाणे
लाजून पहाणे
मला  आठवते
ते हसणे.
[8/15, 3:39 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *आकस्मात चारोळी स्पर्धा*

*उंच माझा झोका*

उंच माझा झोका देई
उन्नतीचे स्वप्न या जीवनी
परी साद ऐकून धरतीची
येई मागे पुन्हा परतुनी.
------------------------------
स्पर्धेसाठी 👆�
---सुवर्णविलास (40)
[8/16, 12:25 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *चित्रशलाका चारोळी स्पर्धेसाठी*
पुस्तक माझे सखा सोबती,
समृद्ध होईन वाचून तयां मी,
जरी मी जगता आहे पणती,
उजळेन दशदिशा ज्ञानप्रकाशाने मी.

✍🏻  सुवर्णविलास (40)
         9049211785
[8/18, 5:26 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): स्पर्धेसाठी 👉�
सागरापरी अथांग जिची माया
ती बहीण ओवाळते या भाऊरायास
घडे परिसस्पर्श जीवनी या माझ्या
रक्षाबंधनाच्या या शुभदिनास.

------सुवर्णविलास (40)
[8/23, 12:09 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *चित्रशलाका स्पर्धेसाठी*

तोल सावरते दोरीवर चिमुकली
बाप वाजवातो ढोल
पोटाची या खळगी भरण्या
नसे आम्हां जीवाचे मोल.

*----सुवर्णविलास (40)*
[9/6, 10:19 AM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *चित्रशलाका स्पर्धेस*

डोईवर असे भार जरी
हॄदयी असे आस शिक्षणाची
लेक वाचवा ,लेक शिकवा
हिच आहे नांदी भविष्याची .

*---सुवर्णविलास(40)*
[9/19, 12:47 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): शहिद वीर जवाना
नमन तुझ्या शौर्याला
नापाक इरादे उधळले तू
बलिदाने रक्षिले तू मायभूला.

-----सुवर्णविलास (40)
मनस्वी श्रद्धांजली पर (स्पर्धेसाठी नाही)
[9/22, 12:30 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): स्पर्धेसाठी
*जीवन एक संघर्ष*

जीवन एक संघर्ष
मजा याची घेऊन बघ
मोडला पहिला  डाव जरी
दुसरा पुन्हा खेळुन बघ.

----सुवर्णविलास (40)
[9/29, 1:57 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): साहित्य दर्पण आयोजित...
नाद चारोळी स्पर्धेसाठी

*‘धगधगती आग दहशतवाद’*

धगधगती आग उरातील आमुच्या
बेचिराख करील हा दहशतवाद
नापाक इरादे उध्वस्त करा एकदाचे
बस्स झाला आता हा संवाद.

------सुवर्णविलास (40)
[10/6, 2:03 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नाद चारोळी स्पर्धेस*

*सहवास तुझा माझा*
आचंद्र-सूर्य तारे राहील
आयुष्याची सोबत आपली
जन्म-जन्मातरी अशीच राहील

------सुवर्णविलास(40)
[10/11, 12:22 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *चित्रशलाका स्पर्धेस*

शुभदिनी या लुटुया सोने
क्षण मांगल्याचा संपन्न करू जीवनी
संदेश शांततेचा बुद्धांचा
आचरु सर्वांनी या शुभदिनी.

----सुवर्णविलास(40)
[10/13, 6:34 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नाद चारोळी स्पर्धेस*

राजकारणात हवी सत्ता
म्हणून धर्म तुम्ही वापरता
अजाण नाही आता ही जनता
जसे तुम्ही  समजता.

------सुवर्णविलास(40)
[10/18, 1:46 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *सचित्र चारोळी स्पर्धेस*

स्मरण करुनी दाभोळकरांचे
अंधश्रद्धेला दया मुठमाती 
स्वागत करुनी स्त्री जन्माचे
उजळु दया पणती.

*-----सुवर्णविलास (40)*
[10/20, 5:57 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नाद चारोळी स्पर्धेस*

सर्वस्व अर्पुनी संसारासाठी
लेक नांदते सासरी
परी सणवार येता
मायलेकीला ओढ माहेरची.

-----सुवर्णविलास (40)
[10/27, 12:02 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नादचारोळी स्पर्धेसाठी*

तुझ्या जन्माने मन माझे सुखावले
मनमोहिनी तू जीवन माझे फुलविले
पाहता गालावरची खळी तुझ्या
हास्य माझ्या मुखावर अलगद विसावले.

✍ *सुवर्णविलास (40)*
[10/30, 9:31 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास):
बेचिराख झाली यांची माणुसकी
सेल्फीचा मोह यांना आवरेना
यातना किती भयाण इथल्या
जाण ना याची मनी  असेना.

(औंरंगाबाद मैदानावर सेल्फी काढणा-या महाभागांसाठी)

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती


           
               *लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
      
           स्वतःकडे जे जे आहे ते ते स्वतःसाठी राखून ठेवणे ही मानवी प्रकृती,आहे त्यापेक्षाही अधिकची अपेक्षा करणे ही विकृती आणि जे जे आहे ते ते स्वतःस गरजेइतके ठेवून उपेक्षितांना देणे ही संस्कृती.देण्याचा आनंद हा भारतीय संस्कृतीचा मुळ गाभा.पूर्वीपासून आदर,प्रेम,संस्कार,नितिची-चारित्र्याची शिकवण,भूतदया हे सर्व देणे नि जपणे ही गोष्ट म्हणजे संस्कृती आहे.निसर्ग हा संस्कृती चा आद्यगुरु आहे.निसर्ग हा पर्यावरणातील सर्व घटकांना आपल्याकडे जे जे आहे त्याची मुक्तहस्ते निरपेक्ष भावनेने देत उधळण करतो नि चराचरात आनंद भरून टाकतो.  आपल्या कृतीने,कर्तुत्वाने,वृत्ती-प्रवृत्तिने ,आचरणाने इतरांच्या चित्तवृत्ति उल्हासित करता येणे हीच खरी संस्कृती होय, जी या भारतवर्षात अनादिकालापासून नांदत आली आहे. आश्रम,गुरूकुल,एकत्रित कुटूंबे,शेजारी,लहान गावे ही संस्कृती निर्मिती,संवर्धन नि दृढीकरणाची प्रमुख स्थाने पूर्वी ओसंडून वाहत होती.याच्या प्रवाहात अनेक सद्विचारांची निर्मिती होऊन या विचारांनी समाजजीवनात सुसंस्कृतीची रुजवण केली.
               मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.सुसंस्कृतीचे जतन केल्यानेच मनुष्याच्या सामाजिकतेची जोपासणा आजतागायत झालेली दिसून येते.जेव्हा- जेव्हा,जिथे-जिथे संस्कृतीचे अध:पतन झाले तिथे त्या समाजाचा पर्यायाने मानवाचा विनाश घडल्याचे इतिहासापासून आपणांस पाहायला मिळते. संस्कृतीच्या निर्मितीत मानवाचा मोठा वाटा आहे.निसर्गदत्त लाभलेल्या भौतिक सुविधांचा,जीवनाचा आपल्या प्रयत्नांनी योग्य तो बदल घडवून सर्वांसाठी आनंदप्राप्ती,उपयुक्ततता निर्माण करणे म्हणजे संस्कृती.
            फार वर्षापूर्वी गावे होती आणि तीही लहान होती पण या लहान गावात राहणारी माणसे परस्परांजवळ होती,मनाने मोठी नि निर्मळ होती.गाव म्हणजे जणू एक अख्खे मोठे कुटुंबच होते.मंदिरात भजन-किर्तने होत असत,पारावर गप्पा व्हायच्या, घरा-घराची सुख-दु:खे ही गावाची सुख-दु:खे व्हायची.माणसं माणसाला जपायचीत.पणजी -पणजोबा,आजी-आजोबा या कुटुंबाच्या वटवृक्षाच्या छायेत सारे कुटूंब भरून पावलेले असे. या ज्येष्ठांच्या बोलण्याचालण्यातून,नित्य वर्तनातून भारतीय संस्कृती व्यक्त होत असे.
                    संगीत,साहित्य,धर्म,मानवता,तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्या संवर्धनात आनंद शोधणे हे संस्कृतीचे सार आहे.ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो असे मानत असे की आत्म्याचे संस्करण हाच संस्कृतीचा कळस आहे.मानवाच्या ठायी असणारे दुस-याप्रती उन्नत आणि उदात्त भाव हेच या भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान  आहे.  एकपत्नी,एकवचनी श्री प्रभू राम  , श्रीकृष्णाची गीता, कर्णाचे औदार्य,एकलव्याची गुरुभक्ती, ज्ञानेश्वरांचे पसायदान,संतांची शिकवण ,जिजाऊंचे संस्कार,शिवरायांच्या मातृभक्ती,महात्मा गांधीजींचीअहिंसा,क्रांतीकारकांचा त्याग व बलिदान या सर्वांत भारतीय संस्कृती सामावलेली आहे. संस्कृती ही जगण्यात असते सांगण्यात नसते. *संस्कृती ही आईच्या दुधाप्रमाणे असते.*मानवाचे भरण-पोषण निरपेक्षपणे करण्याचे कार्य संस्कृती करते.जन्मने नि जगणे ओघाने घडते,ती एक प्रकृती असते पण कशासाठी जगावे हे या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीच्या झोपडीत शोधावे लागते. आज चंगळवादी,सुधारणावादी जगात या कुटिराचे मुल्य लोप पावत चालल्याचे प्रकर्षाने जाणवते.
                ज्ञानविज्ञानाच्या बळावर स्वतःला प्रगत म्हणवणारी आजची विकृती भारतीय संस्कृतीचा -हास करू पाहत आहे.क्षणिक सुखाने जगावे कसे हे या आधुनिक जगातील सुधारणा सांगत आहेत पण कशासाठी नि कोणासाठी जगायचे, जीवनाचे शाश्वत सुख कशात आहे हे संस्कृतीच सांगते.पैशाने विकत घेता येणारी सुखे मानवाच्या आयुष्यातुन उठवत आहेत याउलट संस्कृतीने लाभणारे सुख मानवाचे आयुष्य घडवते हेच आजचा मानव विसरून सुधारणेच्या नावाखाली ऊर फुटेस्तोवर नुसताच धावत आहे.विज्ञानाच्या क्रांतीने जग भौतिकदृष्टया जवळ आले आहे पण या प्रगतीने माणूस माणसांपासून दुरावला आहे.बाह्य आनंदात रमलेल्या माणसाने आत्मिय सुख,आनंद नक्कीच गमावला आहे.आपली संस्कृती ही आपल्या असण्यात असते. सुधारणा ही आपल्या दिसण्यात असते. असणे नि दिसणे यांत दिसण्याने असण्यावर आज मात केली आहे. भारतीय संस्कृती हे साक्षात जीवनदर्शन आहे.पण आजकाल हे लोप होत आहे.वर्तमान युगात भौतिक प्रगतीचा वेग वाढला आहे पण समाजाची सांस्कृतिक पातळी खालावली आहे.चिरेबंदी वाडे,लहान घरे असणारी लहान गावे नि त्यातील असणारा कौटुंबिक जिव्हाळा लयास जाऊन फ्लँट,बंगले,शहरे यांत स्वतःच्याच भावविश्वात रमलेल्या,नात्यागोत्यांचा विसर पडलेला माणूस आधुनिकतेत स्वतःला अक्षरश: भरडत आहे. आज जगातील सुधारणेच्या नावाखाली स्वतःच्या आयुष्याला स्वतःच छळलेले लोक भारतीय संस्कृतीचे आचरण करून जीवनाचा आनंद सोहळा करत आहेत पण पिकते तिथे विकले जात नाही,दुरून डोंगर साजरे या उक्तींप्रमाणे आपण भारतीय आधुनिकीकरणाची पट्टी स्वतःच्या डोळ्यांना बांधून भारतीय संस्कृतीच्या लख्ख प्रकाशातून अधोगातीच्या अंधाराकडे वाटचाल करत आहे.अस्तव्यस्त शहरीकरण,विभक्तकुटुंबे,वाढतेवृद्धाश्रम,अनाथालये,पाळणाघरे,वाढती व्यसनाधिनता,बालगुन्हेगारी,शिक्षणाचे बाजारीकरण,वाढता भ्रष्टाचार,बदलती आधुनिक जीवनशैली,भ्रमनिरास करणारी ऐहिक सुखे ,हरवलेली संवेदना या सगळ्यांच्या प्रबळतेपुढे भारतीय संस्कृतीचे आकाश मळभले आहे.
                वर्तमान युगात आधुनिकतेची कास धरून जगासोबत प्रवास करणे जरी गरजेचे असले तरी हा प्रवास भारतीय संस्कृतीच्या गाडीतून व्हायला हवा.यामुळे अपघात न घडता समस्त मानव कल्याणाच्या ध्येयापर्यंत पोहचणे नक्की होईल.आधुनिक विश्वाच्या सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य भारतीय संस्कृतीकडून व्हावे.
                जय हिन्द-जय भारतीय संस्कृती!

-----सुवर्णविलास (40)

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

बेभान पावसास.....

*बेभान पावसास*

भेट घेण्या अवनीची
आसुसलास तू वरुण
अलगद येऊन बिलगलास
ऊर अवनीचा आला भरून.

कोसळल्या जलधारा बेभान
शहारली बघ ती धरा
नखशिखांत भिजली मनमुराद
तृषार्थ जीव सुखावला सारा

कोसळल्या सरीवर सरी
जलमय झाली सृष्टि सारी
नटली -सजली वसुंधरा
दिसती जणू नववधू ती साजिरी.

आगमनाने सर्वदूर तुझ्या
चिंब झाले जनही सारे
चिंता सरली मनीची
हर्ष बहुत सर्वत्र पसरे.

हर्ष तो असाच राहु दे
चिंता पुन्हा आता लावू नको
अवनिच्या प्रीतीखातर
बेभान आता बरसू नको.

-----सुवर्णविलास (स्वरचित)

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

*जगणे माझे.....*

छंद मला लागला 'स्व' चा
या गर्दित माणसांच्या घुसमटतो मी
जाण ना राहीली आयुष्याची
नादात माझ्या एकटाच जगतो आहे मी

दिप माझ्या अंतरीचा
कधीच मालवला आहे मी
अंध:कारात या राहुन
प्रकाशासाठी चाचपडत आहे मी

बुडाखाली अंधार माझ्याच
जरी मज  ठावे आहे
दाखवावयास अस्तित्व माझे
मी स्वतःस जाळतो आहे

साद माझ्या अंतरीची
 कधी ऐकलीच नाही मी
'स्व' च्या कोलाहलात या
मुद्दाम बहिरा होऊन गेलो मी

आभासी या दुनियेत रमताना
आपल्याच माणसांतुन दुरावत आहे मी
जाणत असुनही सारे दुरावे
बेभान होऊन जगत आहे मी

वादळात अस्थिरतेच्या
पुरता गुरफटलो आहे मी
ऊर फुटतो आहे तरी
*जगणे माझे धाववत आहे मी.*

*------सुवर्णविलास.*

('स्व' त गुरफटुन आभासी दुनियेत रमलेल्या माणसांवरून मला सुचलेले काही.)

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

वाचन प्रेरणा दिन

*वाचन प्रेरणा दिन (15 ऑक्टोबर) निमित्ताने*
         *स्वरचित*

1) घरी ज्याच्या पुस्तके छान
     तो  जगती महान.

2) वाचाल पुस्तके छान
     होईल आपला देश महान.

3) प्रेरणा घेऊ वाचनाची
     करू प्रगती जीवनाची.

4) वाचन कर पुस्तकांचे
     होईल नंदनवन जीवनाचे.

5) करता मैत्री पुस्तकांशी
     जीवनात आनंदाच्या बरसतील राशी.

6) ज्याला असे वाचनाचा ध्यास
      त्यालाच मिळते यश खास.

7) करतो जो नित्य वाचन
      समृद्ध होते त्याचे मन.

8) वाचन देई मना संस्कार
     जीवनाला मग येई आकार.

9) *अग्निपंख* साकरून केली *प्रज्वलित मने*
      *असे घडवा तुमचे भविष्य* सांगुन कलाम आपणांस गेले.

10) कलाम होते *राष्ट्रपती*
       या देशाचे *शास्त्रज्ञ*महान
      *अग्नी,आकाश,नाग,पृथ्वी,त्रिशुल* चे जनक ते
       आहेत भारताची आजही शान.

            *-------सुवर्णविलास.*

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६


          *नातं*

ठरवुनही तुला टाळणं,
मला कधी जमलच नाही,
तुला पाहिल्याशिवाय,
 जीव माझा कधी रमलाच नाही.

ठरवुनही आबोला तुझ्याशी,
कधी धरता आलाच नाही,
मनमुराद तुझ्याशी बोलल्याशिवाय,
मन माझं कधी भरलंच नाही.

ठरवुनही तुझ्या नयनी पाणी,
मला पाहवत नाही,
तु खळाळून हसल्याशिवाय,
मन माझं कधी फ़ुललच नाही.

ठरवुनही तुझ्यावर माया न करण,
मला कधी जमलंच नाही,
तुझ्याच मायेने मोठा कधी झालो,
मला कधी कळलंच नाही.

नातं आपलं बहीण-भावाचं,
इतकं प्रेमळ असतं,
मला कधी उमगलच नाही,
सासरी गेल्यानंतर तू,
मला मात्र आता मुळीच,
करमत नाही.....

*------ सुवर्णविलास.


      *घ्यावा जरा विसावा*

आयुष्यभर केलेत  अपार कष्ट
उभारला देखणा संसार
माळी बनुनी या संसाराचे
फुलवलित ही बाग बहारदार

उरी लेवुनी स्वप्न जीवनाचे
सोसले सारे क्षण आनंदाने
वेदना होत्या अनंत मनी जरी
सदैव राहिलात हसतमुखाने

मोल नाही कर्तुत्वाचे तुमच्या
अमुल्य आहे सारे काही
निःशब्द आहेत भावना मनाच्या
कृतज्ञतेचे नयन सांगती सर्वकाही

आज भूमिका तुमची वठविताना
क्षण सारे आठवतायत  आम्हांला
येते तुमच्या दिव्यत्वाची प्रचिती
आपसुक होतेय जाणीव मनाला

द्यावे आम्हांला सदैव आशिष
बळ द्यावे आमच्या मना
आजन्म रहावे पाठीशी आमच्या
मोडू न द्यावा आमचा कणा

पूर्ण झाली आहेत स्वप्ने सारी
आनंद बहु आता आपणांस व्हावा
केले अनंत आजवरी आपण
आता घ्यावा जरा विसावा.

( *ज्येष्ठ नागरिक दिनी* सर्व ज्येष्ठ नागरिकांस समर्पीत)

-------सुवर्णविलास .

क्रूर श्वापदे......

क्रूर श्वापदे मुक्त संचारती,
आहे इथे भयाण शांतता,
मरतात रोजच जगताना,
यातना त्यांच्या सोबती झाल्या.

बोथट झाल्या संवेदना ,
इथल्या प्रत्येक मनाच्या,
नसे कुणाला कुणाची चिंता,
जाणिवा इथे लावारिस झाल्या.

गुदमरतात इथे अगणित श्वास,
पेटतात देहाच्या चिता जितेपणी,
अबला देहाचे लचके,
तोडले जाताहेत निर्भयपणे.

होताहेत नित्य बलात्कार,
भयभयीत असे प्रमाणिकता,
उजळ माथी वावरताहेत बिनधास्त,
भ्रष्टचारच बहू तो  झाला शिष्टाचार.

शापित झाले जिणे रोजचे,
मरणयातना भोगती मनी,
 झाला आहे अभिमन्यू सत्याचा,
घेरला आहे असत्याच्या चक्रव्यूहात.

तरीही मी जगतो आहे
या स्वार्थी,असत्य,भ्रष्टाचारी दुनियेत
घेवून मनी विश्वास
तुझ्या न्यायाचा.

पुन्हा एकदा राम,कृष्ण,नरसिंह
होवून करशील निर्दालन
या सा-या रावाणांचा,
कंसांचा नि,
हिरण्यकश्यपूंचा.

सुवर्णविलास (40)


*स्त्रीत्वाचा शाप*

चाहुल लागता मज जन्माची,
आक्रंदन होई मना-मनात,
घोट घेण्यास गर्भात माझा,
सरसावतात हात घरा-घरात.

श्वास कोंडतो गर्भातच माझा,
असह्य वेदना माझ्या मनात,
दिव्य स्वप्ने मज जीवनाची,
विझती माते तुझ्याच उदरात.

जन्म तव जरी जाहला माझा,
मुखावरी  चिंता असे समस्ता,
स्वागत न होई हर्षभराने,
वंशाचा दिवा हवा असे समस्ता.

लहानाची  मोठी होत असता,
 पायात माझ्या रुढीच्या श्रृंखला,
मुलीच्या जातीने रहावे कसे,
हेच शिकवितात सारे मजला.

मानूनी धन परक्या घरचे,
करी आबाळ मज शिक्षणाची,
नसे पर्वा छाटती सारे पंख,
उरातील माझ्या सगळ्या स्वप्नांची,

सप्तपदी ती चालत असता,
 नयनात अनेक स्वप्न दिसे,
क्षणात कोसळी सारे इमले,
हुंडाबळी तो माझा ठरला असे.

लक्ष्मी,पार्वती ,आंबा,जगदंबा,
महिषासुरमर्दिनी असे मी,
देवी मानूनी पुजतात मला,
तरीही समजती मला अबला.

विकृत नजर शोधत असे,
झडप घालण्यास मजवरी,
श्वापदे तव असती तयार,
करती अत्याचार  निर्भयावरी.

बिकट वेदना घेऊनी ऊरी,
जीवन कंठीत राहते सदा,
सुंदर जरी हे आयुष्य देवा,
स्त्रीत्वाचा माझ्या शापच वाटे मला.

-----✍🏻 सुवर्णविलास 
अवतरला श्रावण...

गर्द निळ्या या नाभाखाली,
हिरवाईची शाल पांघरली,
मोद घेऊनी आपुल्या उरी,
पहा अवतरला श्रावण धरतीवरी.

अधून-मधून पहा मेघ अवतरती,
जलाभिषेक करती धरतीला,
क्षणात अवतरती रविराजाची स्वारी,
घेवूनी हाती दोर इंद्रधनुष्याची,
पहा अवतरला श्रावण धरतीवरी.


मुक्त विहंग ते नभी फिरती,
खळाळती जलधारा धरतीवरी,
मयूर पहा तो नृत्य करी,
पाहुनी तया होई हर्ष मनी,
पहा अवतरला श्रावण धरतीवरी.

सुखद क्षण  आठवी मनी,
हर्ष दाटती तव  लोचनी,
पाहुनी अवघा सोहळा भरजरी,
बेभान हास्य फुलते मुखी,
पहा अवतरला श्रावण धरतीवरी.

--------सुवर्णविलास(सुनील अस्वले)

(श्रावण स्वागताला माझी स्वरचित कविता----सुवर्णविलास)
बळ दे माझ्या पंखात....


बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
जगण्याच्या या लढाईत
कदापि न हरण्याचे
सदैव झुंजत राहण्याचे
आत्मविश्वासाने जिंकण्याचे
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात.

करण्या मात या तमावर
भेदण्या हे दुष्काळाचे दुष्टचक्र
करण्या संघर्ष मजला हा
पुरून उरण्या तया या जगात
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात

वेदना असे जरी भयाण ही
मज नसू दे त्याची चिंता
साथ तुझी असता सदा
मज नसे भ्रांत कदा
साथ तुझी राहण्या सदा
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात

मज नसावे भय कदा
जगण्या असावी प्रीती सदा
निर्भय जगणे लाभु दे मजला
आत्मघात ना कधी घडावा
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात

गोठले जरी रक्त तयांचे
परी लढती देश रक्षणास
सांग का हरावे मी
म्हणती 'जय जवान जय किसान'
बळ दे माझ्या पंखात
हे ईश्वरा बळ दे माझ्या पंखात
----सुवर्णविलास (सुनील अस्वले)


(आत्महत्येचा विचार करणा-या माझ्या समस्त बळीराजा ला समर्पित)
▶मुक्त कविता

उठा मुलांनो....

उठा मुलांनो सज्ज व्हा,
नव्या जगाला,नव्या युगाला सामोरे जा,
मागे वळूनी तुम्ही न पाहा,
पुढे पुढे  जातच रहा.

जरी अडखळलात वाटेवरी,
मात करुनी तयांवरी,
नव्या दमाने उभे रहा,
पुढे पुढे  जातच रहा.

नसे कोणी कोणासम,
आपणच असे आपल्यासम,
उगाच का कुढावे जे नसे त्यासाठी,
अभिमाने जगावे जे आहे त्यासाठी.

ध्येय जरी असले दूर,
एक-एक पाऊल टाकत रहा,
उगाच नको घाईगडबड,
उगाच नको आक्रंदन.

माय-बाप तुमचे ते,
पाहतात स्वप्ने तुमच्या भाग्याची,
काय चुकते त्यांचे सांगा?
तुम्हीच त्यांची स्वप्ने असता!

साकारण्यास तया तुम्ही,
व्हा मुलांनो सज्ज आता,
नको दडपण,नको भिती,
आत्मघात तर नकोच नको,
आत्मविश्वास तुम्ही बाळगा,
पुढे पुढे  जातच रहा.

( शिक्षण, करिअरच्या दडपण/अपयशाने आत्महत्येचा विचार करणा-या कोवळ्या मुलांना उद्देशून दैनिक लोकमत मध्ये प्रकाशित माझी कविता )

----सुनील अस्वले(सुवर्णविलास)