सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

शब्दसुगंध दिवाळी अंक 2020



Father



बाप....
 दिवस शनिवारचा, सकाळची शाळा. पहिले काही तास संपल्यानंतर शालेय पोषण आहार देण्याची  वेळ.मीही थोडा नाश्ता करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शालेय आवरातील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत व्हरांड्यात उभा होतो.मुलेही आपले जेवण आटोपून स्वछंदपणे गप्पा मारणे,कोणी खेळ खेळणे तर कोणी नुसतेच उभे राहलेली.हे सर्व पाहत मी उभा होतो.गेल्या चार-पाच दिवसांत उसंत न घेतलेल्या पावसाने क्षणभर विश्रांती घेतली असता मैदानावर साचलेल्या पाण्यात उड्या मारताना काहीजण मला दिसत होते.पण त्यांच्या या बालआनंदात व्यत्यय आणण्यास माझे मन तयार नव्हते.इतक्यात चिन्मय माझ्याजवळ आला नि त्यांच्या कृत्याची तक्रार नोंदवू लागला.आता याच्याही मनाचे समाधान करणे मला भाग होते.मग शिस्तीच्या नावाखाली मी त्या मुलांना उगाच रागवण्याचा अविर्भाव आणून तेथून हटकले.याक्षणी तक्रार घेऊन आलेल्या चिन्मयची आनंदी मुद्रा माझ्या नजरेआड झाली नाही. हे सर्व न्याहाळताना ,अनुभवताना तिसरीच्या वर्गातील संकेत माझ्याजवळ आला नि मला नुसतीच हाक देऊन गेला.त्याचा हा हाक मारण्याचा एपिसोड टि.व्ही.वरील मालिकांप्रमाणे रिपिट होत राहिला.त्याच्या प्रत्येक हाकेला मी ओ देत होतो.शेवटी न राहवून मी त्याला थोडा वैतागुनच विचारले,अरे संकेत!काय काम आहे?का उगाच सारखा बोलावत आहेस? मी काय कुठे पळून चाललो आहे की काय? एका दमात एवढं सारे बोलून झाल्यावर मला वाटले आता हा  घाबरून वर्गात जाईल.पण या महाशयांनी माघार घेतलीच नाही.यापुढे संकेत मला म्हणाला ,मग शाळा सुटल्यावर जातासा की घरी.त्याच्या या बोलण्याचा मला राग आला पण त्याला आणखी बोलते करण्याच्या हेतूने मी राग मागे सारून त्याला विचारले,अरे संकेत मग इथेच राहू का? नि मग मी जेवायचे कोठे? यावर तो उत्तरला राहा की इथे नि जेवा आमच्या घरी.या त्याच्या बालबुद्धिचे मला आता जरा जास्तच कुतूहल वाटायला लागले नि त्याला आणखी बोलते करायचे ठरवून मी त्याला म्हणालो,अरे! माझ्या घरचे माझी वाट पाहतील की! त्यांच्याकडे नको का जायला मला? या माझ्या प्रश्नावरही त्याने उपाय शोधून ठेवलेला होताच.जावा की शनिवारी आणि रविवारी परत या सोमवारी.
                आता मात्र मला त्याच्या जाणतेपणाची जाणीव व्हायला लागली होती.सध्याची पिढी कशात मागे राहू शकत नाही याचा प्रत्यय मला येत होता.मी त्याच्याकडून क्लीन बोल्ड होण्याच्याच मार्गावर होतो.तरीही मी माझी विकेट सहजासहजी गमवायची नाही ठरवलेलं.याच निग्रहानं मी त्याला विचारले, संकेत बाळा तुला चालतं का तुझे बाबा तुझ्याजवळ नसलेले? करमत का तुला त्यांच्याशिवाय? आता आपण याला षटकार खेचला आहे ही माझी अहंमिक भावना.पण त्याने यापुढे टाकलेल्या याँर्कर चेंडूने मात्र माझ्यातील गुरूजी नि बाप दोघांची विकेट काढली.
            तो तिसरीच्या वयोगटातील विद्यार्थी.जेमतेम नऊ वर्षे वयाचा.या वयात मानसशास्त्रीय दृष्टिने विचार करता मुलांना भावनिक,शारीरिक सुरक्षितता महत्वाची असते.ही सुरक्षितता त्याला सर्वप्रथम त्याच्या आई-वडील नि कुटुंबातील इतर सदस्यांकडून असते.त्याचे त्याच्या कुटुंबातील प्रत्येक घटकाशी अतूट नाते असते.असे नाते की ज्याच्या आधारावर तो आपल्या आयुष्याची शिडी बळकट करत असतो.नि या भक्कम पाय-यांवर स्वार होत तो आयुष्यातील अनेक आव्हाने पेलत यशशिखर गाठतो.हा सर्व तर्क या विद्यार्थ्याच्या उत्तराने पूर्णत: निष्क्रिय केला असे मला वाटते.संकेत अगदी सहजच म्हणाला ,करमतय की.पप्पा नसले म्हणून काय झाले.मम्मी आहे की घरी.
                   मी क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहीलो नि शेवटी माझा झालेला पराजय मला आवडेना म्हणून मग मी त्याच्यावर चिडून त्याला वर्गात जाण्यास सांगितले. 

संकेत वर्गात निघून गेल्यावर माझे पुढे कशातच मन लागेना.पप्पा नसले म्हणून काय झाले; मम्मी आहे की घरी.त्याच्या या वाक्याने माझ्यातील बापपणाला पुरते विचारमग्न केले होते.याच नव्हे तर बालवयातील नि युवावस्थेतील मुलांच्या मनात 'बाप' कसा असेल?त्यांच्या जीवनात बापाचे स्थान काय असावे? आई इतकाच जिव्हाळा,ओढ,माया बापाबद्दल मुलाच्या मनात असते का? संकेतने असे का म्हटले असावे? बाप यांत कुठे नि का कमी पडतो?या प्रश्नांचे  विचारचक्रच माझ्या मनात घुमू लागले.
        प्रत्येक मुलाच्या जीवनात त्याच्या आईचे अनन्यसाधारण असेच महत्त्व आहे.'आई माझा गुरू,आई कल्पतरू ,सौख्याचा सागरु,आई माझी' या श्लोकातून आईचे जीवनातील स्थान अधोरेखीत होते.पण आई प्रमाणेच मुलाच्या जीवनप्रवासात बापदेखील तितकाच महत्त्वपूर्ण असतो.पण संकेतच्या या वक्तव्याने मात्र बापाचे सध्याच्या मुलांच्या मनातील स्थान काय असावे हे विचारधीन झाले. बाप हा केवळ भौतिक सुखसोयी करून देणारा,कुटुंबाच्या गरजा भागवणारा घटक असेच का त्याचे नाते असते.केवळ बापच कमविता असेल तर त्या घरातील मुलांचे ऋणानुबंध आईशी जसे जुळलेले असतात तसे ते बापाशी जुळत नसावेत का? कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वाधिक वेळ कुटुंबातून बाहेर राहिल्याने व त्यात भर म्हणून मुलांचे संगोपन या संकल्पनेत डोकावलेला पुरषी अहंकार या कारणांनी या बापाचे मुलाशी इतके घट्ट नाते तयार होत नसावे जितके मुलाचे त्याच्या नित्य सहवासात असलेल्या त्याच्या आईशी असते.क्षणभर डॉ.सलील कुलकर्णी यांनी गायलेले 'कोमेजून निजलेली एक परीराणी.... या गीताच्या ओळी कानावर गुंजन करु लागल्या नि मन घरातील माझ्या मुलांकडे धाव घेऊ लागले.पण शाळा सुटायला अजून तासभर वेळ होता.'Emotions are not great than our duty' या सुवचनाचीही आठवण याक्षणी मनात होती.शेवटी मी माझी कर्तव्यपुर्तता करून शाळा सुटल्यावर घरी मार्गस्थ झालो.घरी पोहचल्यावर आजच्या उर्वरित दिवसातील बहुतेक वेळ मी माझ्या ऊर्जास्रोत असणा-या मुलांच्यासोबत व्यतीत केला. तसे मी नेहमीच दिवसातील अधिक वेळ माझ्या दोन्ही मुलांच्या सोबत घालवतो.आई इतका किंबहुना थोडा जास्तच माझा सहवास माझ्या या दोन्ही बालवयातील मुलांना हवा असतो.
          जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करताना आजच्या या धावपळीच्या युगातही आपल्या  मुलांचे पालकत्व आईच्याच ममतेने बापाने जोपासावे असे मला मनोमन वाटते .मुलांना त्यांचा बाप आई इतकाच हवाहवासा वाटावा यासाठी प्रत्येक बापाने आपल्या मनात माऊलीची स्थापना करायला काय हरकत आहे. असे घडले तर भविष्यात 'आई-बाबा माझे गुरू,आई-बाबा कल्पतरु,सौख्याचा सागरू आई- बाबा माझे' असाही श्लोक मुलांच्या ओठी येईल ना!
   यापुढे जाऊन ज्या घरात  भौतिक सुखप्राप्ती करिता धावणा-या बापाच्या जोडीला मुलाची आईदेखील घराबाहेर पडून धावत आहे त्या घरातील मुलाचे मन कोणाला शोधत असेल  हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न अनुत्तरितच राहतोय.
        ----  समाप्त.
-----✍️©श्री.सुनिल विलास अस्वले,रा. वडणगे,ता.करवीर,जि.कोल्हापूर. पदवीधर अध्यापक -केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा. मोबाईल-9049211785 ------

सोमवार, १ जून, २०२०

सेवानिवृतांचा परिसस्पर्श

सुचलेले काही...
🍁🍃🍂🍁🍂🍃
*सेवानिवृत्तांचा परिसस्पर्श*

काल 31 मे...शैक्षणिक सेवेतील अनेक शिक्षक बांधव- भगिनी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.आजपासून या सर्वाचे आयुष्य एका नवीन विश्वात प्रवेश करेल.आतापर्यंत या सेवेत राहून प्रामाणिकपणे कार्य करताना अनेक अनुभव   घेत त्यांनी स्वतःसाठी करावयाच्या अनेक गोष्टींचा निश्चितच त्याग केला असेल.शिक्षक म्हणजे देशाचे उन्नत स्वप्न रुजवणारा घटक.ही स्वप्नं रुजवताना स्वतःच्या स्वप्नांचा मात्र त्याला विसर पडलेला असतो. अशी अनेक अपूर्ण स्वप्ने मनाशी बाळगत त्याचा हा प्रवास अखंडपणे, निरपेक्ष वृत्तीने,अहंकार विरहीत, सदैव हसतमुख विद्येच्या प्रांगणात सुरू असतो.30- 35 वर्षांच्या सेवेत स्वतः समोर असलेल्या निरागस मुलांना घडवताना मनात जपलेले अनेक क्षण त्याच्या हातून निसटतात. पण तरीही त्याची कसलीच चिंता ,वेदना मनात न बाळगता अखंड पणे समाजाच्या ऋणात राहून ते फेडण्यासाठी त्याची नित्य धडपड सुरू असते.विद्यार्थ्यांच्या यशात स्वतःचे यश मानणारा हा एकमेव साधक. 
       आज तो या ऋणातून मुक्त होणार असतो नि त्याने घडवलेला समाज,उभारणी केलेले राष्ट्र सदैव त्याचा ऋणी बनतो.माझ्या गत 20 वर्षाच्या सेवेत  मी माझ्यासोबत कार्यरत अनेक गुरुवर्यांची सेवानिवृत्ती  अनुभवली. यातील काही प्रत्यक्ष सोबत कार्य करणारे,काही प्रशिक्षणाच्या माध्यमातून जोडले गेलेले,काही कार्याच्या निमित्ताने जोडलेले.... या सर्वांनी मला त्यांच्या कार्यातून,मार्गदर्शनातून,चर्चेतून ,त्यांच्या अनुभव कथनातून नेहमीच समृद्ध केले. शैक्षणिक सेवेतील कार्य प्रामाणिकपणे कसे करावे हे सांगतानाच जीवन समृद्ध करण्याच्या गोष्टींची देखील शिकवण मला यांच्याकडून लाभली.सत्ता,संपत्ती,पद ,प्रतिष्ठा,मान या माणसाला भ्रष्ट करणाऱ्या प्रवृत्तीपासून स्वतःला कसे वाचवायचे अन समाधानी आयुष्य,इतरांना हेवा वाटावा असे आयुष्य कसे जगावे ,कार्य कसे करावे याच्या अनेक गोष्टी यांच्या अनुभवाने मला लाभल्या.परीसस्पर्शाने लोखंडाचे  सुवर्ण होते हे ऐकिवात आहे.प्रत्यक्ष कोणी पाहिले नाही.पण या सर्वांच्या परीसस्पर्शाने माझ्या आयुष्याचे सुवर्ण होतानाचा अनुभव मात्र मी घेत आहे.

    पेशाशी प्रामाणिक राहुन कार्य केलेल्या या सर्वांना यापुढील आयुष्य अखंड आरोग्यसम्पन्न,सुखी-समाधानी व त्यांच्या समस्त इच्छा पूर्तीचे दीर्घायु जावो..हीच सदिच्छा!!!
✍️ सुवर्णविलास
दि.01/06/2020
www.suvarnvilas.blogspot.com

शनिवार, ९ मे, २०२०

वेबिनार 09/05/20

आज दि.09/05/2020 रोजी आयोजित कोविड 19 च्या कालावधीतील केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम या वेबिनार मध्ये महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त मा. विशाल सोळंकी साहेब यांनी मांडलेले प्रेरणादायी, चिंतनात्मक व अनुकरणीय विचारातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे,

*येणारी 20-25 वर्षे आव्हानात्मक*

*येणारे शैक्षणिक वर्षात सध्याच्या कोरोना संकटामुळे पालकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते त्यामुळे शैक्षणिक फी देऊन शिकवणे जमणार नाही म्हणून जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित शाळांकडे विद्यार्थी घालणे वाढू शकते.यातून पटसंख्या वाढ होईल पण निधीची कमतरता असलेने आव्हानात्मक परिस्थितीत कार्य करावे लागेल.*

*शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करावा पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिवसभरात दोन तासापेक्षा अधिक काळ स्क्रीन डोळ्यासमोर नको*
 
*ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण असायला हवे. आई वडिलांना मदत करणे,भावंडांचा सांभाळ करणे हेही शिक्षण असू शकते*

*कोरोना परिस्थिती सुधारली नाही व येत्या जून -जुलै मध्येही शाळा उघडल्या नाहीत तर त्यादृष्टीने शैक्षणीक उपक्रम राबवावे लागणार, मात्र निधीचा पाठींबा देता येणार नाही.*

*दोन वर्षे फेस टू फेस प्रशिक्षणे होणार नाहीत.*

*पदभरती नसेल त्यामुळे आव्हाने वाढणार*

*आव्हाने वाढल्यामुळे स्वतःला सक्षम करावे लागणार.वयाचा विचार करून नकारात्मकता नको.*

*सर्व कामे टीमवर्क म्हणून करावयाची आहेत.*

*आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि इतर गुणात्मक वाढीचे प्रयत्न केले पाहिजेत.*

*मूलभूत कौशल्ये ,अध्ययन निष्पत्ती या बाबी प्रत्येक विद्यार्थी शिकला की नाही हे पहिले पाहिजे.*

*21 व्या शतकातील कौशल्ये विद्यार्थ्यांना देणे आवश्यक*

*समाज व देशाविषयीची संवेदनशीलता हवी केवळ पुस्तकी शिक्षण नको*

*येत्या 1 - 2 महिन्यात घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून चांगली कौशल्ये शिका.*

 *विद्यार्थ्यांना आपण तेच देऊ शकतो जे आपल्यात आहे.*

*शाळा किती दिवस उघडेल हे सांगता येत नाही. 150 दिवसदेखील नाही*

*दिक्षा app चा वापर 100 पट करणे आवश्यक. स्वतः च्या आवडीनुसार ऑनलाइन मटेरिअल वापर गरजेचा*

*सर्व शिक्षकांनी तंत्रज्ञान कौशल्य शिकले पाहिजे*

*PGI मध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरून पहिल्या तीन क्रमांकात*

*आत्मपरीक्षण करून स्वतःत जे कमी आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करा*

*स्वतःचे ,कुटूंबाचे आरोग्य जोपासा, कुटूंबाला वेळ द्या.*

*शिक्षणातून लायक बनतील ,नालायक बनू नयेत असे शिक्षण द्या  ही अपेक्षा एका आई-वडिलांनी व्यक्त केली.*

*विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राधान्याची बाब. शालेय पोषण आहार सर्वांपर्यंत पोहचवा यातून अन्नसुरक्षा होईल.*

*विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शक्य होईल तेव्हा ऑनलाइन नोंदणी करावी. शाळा सुरू झाल्यानंतर आधार कॅम्प होतील.*

*एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये*

*सध्याच्या वातावरणात आई-वडील निराश आहेत.हालाखीच्या परिस्थितीमुळे शाळा हाच मुलांचा भविष्यात आधार आहे.प्रत्येकजण शाळेत असेल याची काळजी घ्या.पटसंख्या टिकवायची नाही तर वाढवायची आहे*

*विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक,भावनिक सुरक्षितता महत्त्वाची.*

*आव्हाने मोठी असतात पण माणूस आव्हानांपेक्षा मोठा आहे*
📲  💻   📡    📞   ☎

मा.विकास गरड यांनी केलेले मार्गदर्शन पुढीलप्रमाणे-

*बालरक्षक चळवळ महत्त्वाची ठरेल. स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे.म्हणून सजग राहणे गरजेचे*

*85% पाठयपुस्तक छपाई पूर्ण ...परवानगी घेऊन वितरित केली जाणार.*

*Study from home* *करिता पालक जागृती करा. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक समिती,माता पालक समिती सदस्यांचे सहकार्य घ्या. मुख्य पालकांचा उपयोग करावा.पाल्य-पाल्य, पालक -पालक सम्पर्क करा.*

*DD सह्याद्री वाहिनीवर रोज सकाळी 10.00 वाजता गली गली सिम सिम हा शैक्षणिक कार्यक्रम*

*फोन,व्हाट्सअप्प,सर्वेक्षण करणारे शिक्षक यांच्यामार्फत पालकांशी,विद्यार्थ्यांशी सम्पर्क ठेवा.शिक्षणाविषयी आश्वासक वातावरण ठेवा.*


  एकंदरीत वरील वेबिनार मधून भविष्यातील शिक्षणाची नांदी ही बहुतांश तंत्रज्ञानावर आधारित असेल हे जाणवते. यासाठी आपण सर्वांनी स्वतःला सकारात्मक विचाराने कालसुसंगत ठेवले पाहिजे हे प्रकर्षाने समजते.

*सदर वेबिनार विना अडथळा  सलग दोन तास सुरू होते. याचा मला लाभ मिळाला*

 
---✍👆 श्री.सुनिल अस्वले,पदवीधर अध्यापक,केंद्र समन्वयक -केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.

माझे लॉकडाऊन उपक्रम..

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

Gratitude

Gratitude 2 -- देशात दूरसंचार क्रांती घडून आली अन माणसांमाणसातील संवादाचे साधन म्हणून टेलिफोन घरोघरी पोहचला. सुरवातीच्या काळात टेलिफोन फारच थोड्या घरांत हा टेलिफोन अत्यंत दिमाखाने विराजित असायचा. या घरातील टेलिफोनचा क्रमांक सर्व आप्तस्वकीय,मित्र यांना दिलेला असायचा..आणि मग आजूबाजूच्या सर्वांना फोन आला की बोलावणे हे या घरातील सदस्यांचे नित्य कार्य असायचे.  प्रतिष्ठतेचे लक्षण असणारा हा टेलिफोन सन 2001 साली आमच्याही घरी विराजमान झाला. 2477073 या क्रमांकाच्या या लँडलाईन टेलिफोनने पुढील बरीच वर्षे आम्हां सर्व नातेवाईक, मित्रमंडळी ,कर्मचारी यांच्यात संवाद घडवून आणायची किमया पूर्ण केली. जीवनातील सुखदुःखाच्या वार्तालापाचा साक्षीदार असणारा हा टेलिफोन आजच्या मोबाईलच्या जमान्यात घराघरांतून नाहीसा झाला असला त्याची अतूट साथ,त्यावर साधलेले संवाद आजही मनाला भूरळ घालतात.लॉकडाऊनच्या काळात आठवणींच्या प्रदेशात सैर घडवून आणणाऱ्या या साधनाचे मनस्वी धन्यवाद!😊

माझ्या मना....(सहज सुचलेले काही)

माझ्या मना....

माझ्या मना..
नको होऊ तू अस्वस्थ
ही दुनियेची रितच आहे
करतील जे चिक्कार प्रेम तुझ्यावर
तेच करतील तुझा तिरस्कार..

तुझ्या हळवेपणाची
उडवतील मज्जा 
व्यवहाराच्या या दुनियेत
तुझे अस्तित्व शून्य आहे 
हे तू लक्षात ठेव...

कुणासाठी करणे विलाप
व्यर्थ आहे तुझे..
इथे क्षणाला बदलणारी
माणसे आहेत अवती-भवती..

कुणाचे बोलणे तू
लावून घेऊ नकोस 
तुझ्या मनाला..
इथे शब्दांना देखील
बदलले जाते सोयीनुसार...

तुझ्या चांगुलपणाला 
नाही काही किंमत आता
बघ जमले तर कणखर हो..
विंदा च्या कवितेतला *दगड* हो...

हेच बजावतो मी तुला
पुन्हा पुन्हा
माझ्या मना बन दगड...
माझ्या मना बन दगड..

✍© सुवर्णविलास.

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

Gratitude

Gratitude 2 -- देशात दूरसंचार क्रांती घडून आली अन माणसांमाणसातील संवादाचे साधन म्हणून टेलिफोन घरोघरी पोहचला. सुरवातीच्या काळात टेलिफोन फारच थोड्या घरांत हा टेलिफोन अत्यंत दिमाखाने विराजित असायचा. या घरातील टेलिफोनचा क्रमांक सर्व आप्तस्वकीय,मित्र यांना दिलेला असायचा..आणि मग आजूबाजूच्या सर्वांना फोन आला की बोलावणे हे या घरातील सदस्यांचे नित्य कार्य असायचे.  प्रतिष्ठतेचे लक्षण असणारा हा टेलिफोन सन 2001 साली आमच्याही घरी विराजमान झाला. 2477073 या क्रमांकाच्या या लँडलाईन टेलिफोनने पुढील बरीच वर्षे आम्हां सर्व नातेवाईक, मित्रमंडळी ,कर्मचारी यांच्यात संवाद घडवून आणायची किमया पूर्ण केली. जीवनातील सुखदुःखाच्या वार्तालापाचा साक्षीदार असणारा हा टेलिफोन आजच्या मोबाईलच्या जमान्यात घराघरांतून नाहीसा झाला असला त्याची अतूट साथ,त्यावर साधलेले संवाद आजही मनाला भूरळ घालतात.लॉकडाऊनच्या काळात आठवणींच्या प्रदेशात सैर घडवून आणणाऱ्या या साधनाचे मनस्वी धन्यवाद!😊

मुजरा शिवराया

करून प्रतिज्ञा स्वराज्याची
अवघे जीवन तू वाहिले
करितो मुजरा हे शिवराया
स्वराज्य आम्हां तू दिधले।

✍©सुवर्णविलास

संयम ( सहज सुचलेले काही)


*सहज सुचलेले काही*

आयुष्यात काही चांगले गवसायचे असेल तर त्याकरिता  संयम महत्त्वाचा असतो.एखाद्या परिस्थितीत तत्काल काही मिळावे ही अपेक्षा माणसाला दुःखी तर बनवतेच पण अपेक्षित गोष्ट मिळेलच याची शाश्वती देखील नसते.

✍ सुवर्णविलास दि.08/04/20

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

मुजरा शिवराया

करून प्रतिज्ञा स्वराज्याची
अवघे जीवन तू वाहिले
करितो मुजरा हे शिवराया
स्वराज्य आम्हां तू दिधले।

✍©सुवर्णविलास

जीवनाचा रंगमंच

जीवन हा देखील एक रंगमंचच आहे.तीन प्रवेशांचे हे नाटक शिकण्यातून ,अनुभवातून साकारले जाते.अनुभव हा या नाटकातील सर्वात मोठा गुरू!  तो आधी परीक्षा घेतो अन मग शहाणं बनवतो. या रंगमंचावरील आपली एंट्री अन एक्झिट मात्र 'त्या' दिग्दर्शकाच्या हाती असते ज्याला आपण कोणी प्रत्यक्ष पाहिले नाही पण रोज नवा सूर्य पाहायला देणारा तो  मात्र जन्माचा पडदा उघडून मृत्यूचा पडदा झाकण्यापर्यंत हे सारं नाटक घडवून आणतो.या दरम्यानची कलाकारी सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी ज्याची-त्याची. आपल्या सादरीकरणाने समाजरूपी प्रेक्षकांची वाहवा मिळवायची की तिरस्कार हा आपला प्रश्न..अंक सुरू आहे तोपर्यंतच दाद मिळायला हवी...पडदा झाकल्यावर समजून त्याचा उपयोग काय??..---सुनिल अस्वले(सुवर्णविलास)

शनिवार, ७ मार्च, २०२०

आजच महिलादिन....

आजच सारे कोडकौतुक,
आजच साऱ्या शुभेच्छा भरभरून ...

आजच वर्णिली जाईल
 महती तुझी अगणित ,
आज गायले जातील,
पोवाडे तुझ्या शौर्याचे ....

आजच म्हणतील सारे 
तू आहेस सबला,
आजच देतील सारे
 मान-सन्मान तुला..

आजच म्हणतील तुला
तू आहेस देवी,
तू आहेस शक्ती,
आजच करतील सारे
तुझा उदोउदो.....

आजच देतील तुला
वागणूक समानतेची ...
आजच होतील तुझ्यावर 
भाषणे,चारोळ्या,
अन कविता उदंड...

आजच होईल तुझ्या
कीर्तीचे गुणगान,
आजच होईल 
चर्चा तुझ्या हक्काची ..

आजच होईल सर्वांना 
जाण तुझ्या अस्तित्वाची ...

मग तुही आजच 
जाशील भारावून
आणि उद्यापासून पुन्हा 
तुझ्यासोबत घडेल तेच ते...

उद्यापासून,

हरघडीचा तिरस्कार घेईल,
जागा तुझ्या आजच्या कौतुकाची 
अन ऐकूही वाटू नयेत अशा शिव्याशाप ..
घेतील जागा तुझ्या  शुभेच्छांची 

क्षणोक्षणीची निंदा घेईल 
जागा तुझ्या महतीची  
अन भिती घेईल 
जागा तुझ्या शौर्याची  ...

होशील तू पुन्हा अबला
जागा घेईल अवमान 
त्या आजच्या मान -सन्मानाची 
अन देवी ऐवजी असशील 
तू फक्त सहनशीलतेची
 एक निर्जीव वस्तू...

 लिंगभेदाचे आसूड नित्य
ओढले जातील तुझ्या पाठीवर
अपकीर्तीची माला घालतील 
हेच सारे तुझ्या गळ्यात..

हक्कांऐवजी कर्तव्याचे भूत
बसेल पुन्हा तुझ्याच मानगुटीवर
अन वर्णिली आणि चर्चिल्या जातील
 फक्त नि फक्त
तुझ्या मर्यादा आणि उणिवा..

असणार नाही कुणाला
तुझ्या अस्तित्वाची जाण
तुला असेल फक्त नि फक्त
सोसत राहण्याचा मान..

आणि मग पुन्हा 
फिरून येईल तो तुझा आजचा एकच दिवस 
तोपर्यंत तुझे तेच ते ,तेच ते...
पुढील महिला दिनापर्यंत...
पुढील महिला दिनापर्यंत...

✍ सुवर्णविलास
         08/03/2020
www.suvarnvilas.blogspot.com

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

ट्रान्सफर पोर्टल मध्ये Teacher profile कसे अपडेट करावे? Teacher login करिता पासवर्ड कसा करावा?

सर्वच शिक्षकांनी ट्रान्सफर पोर्टल मधून स्वतःचे प्रोफाइल  अपडेट कसे तयार करावे.व teacher login  करिता स्वतःचा पासवर्ड कसा करावा? Teacher login मध्ये Use Id काय वापरायचा? 
--/////------//////------//////--
शासनाच्या नवीन सूचनेनुसार  याआधी स्टाफ पोर्टल मध्ये असणारी शिक्षकांची माहिती ट्रान्सफर पोर्टल मध्ये घेण्यात आली आहे. यापूर्वी स्टाफ पोर्टल मध्ये असणाऱ्या सर्व सुविधा आता बंद करण्यात आल्या आहेत. आता आपल्या माहितीतील कोणत्याही तारखेत बदल करण्याकरिता रिक्वेस्ट पाठवणे,जुन्या शाळेतून detach होणे व नवीन शाळेत attach होणे इ.सर्व सुविधा *ट्रान्सफर पोर्टल अंतर्गत टीचर लॉगिन* मध्ये देणेत आलेल्या आहेत.
या नव्याने बदल झालेल्या सर्व सुविधांचा लाभ घेण्याकरिता प्रत्येक शिक्षकाने त्यांचे स्वतःचे लॉगिन तयार करणे अनिवार्य आहे. व याअंतर्गत आपला स्वतःचा User ID (यापूर्वीचा Staff ID) वापरून स्वतःचा स्वतंत्र पासवर्ड तयार करायचा आहे. सदर तयार केलेला पासवर्ड पुढील प्रत्येक कारणासाठी कायमस्वरूपी लक्षात ठेवावा.
आता आपण Transfer Portal मध्ये स्वतःचे लॉगिन कसे तयार करावे हे पाहू.
------------------------------------
➡ सर्व प्रथम गुगल क्रोम अथवा मोझिला फायर फॉक्स  या ब्राउझरमधून edustaff.maharashtra.gov.in  ही वेबसाईट ओपन करा.आता यातील Transfer टॅब वर क्लिक करा.
➡ आता स्क्रीनवर ट्रान्सफर पोर्टलची लॉगिन विंडो दिसते. इथे 1) Select Roll मध्ये Teacher हा पर्याय निवडावा.2) User ID मध्ये आपला स्वतःचा यापूर्वीचा Staff ID भरावा.(सदर स्टाफ आय डी  बदली अर्जात/ बदली आदेशात आपल्या नावाच्या खाली आहे.) 3) Password च्या ठिकाणी प्रथम लॉगिन करताना Guest123!@# हा पासवर्ड भरावा.
4) Captcha code दर्शवल्या प्रमाणे अचूक भरावा व लॉगिन बटनावर क्लिक करावे.
➡ आता तुम्हांला स्क्रीनवर change password ची सूचना येईल त्यास Ok करावे.
➡  यानंतर स्क्रीनवर Mobile no.      व त्यापुढे generate otp   अशा दोन टॅब व त्याखाली New Password व Confirm Password अशा टॅब दिसतील.यातील मोबाईल नंबर च्या जागी तुम्ही कायमस्वरूपी वापरत असलेला मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक अचूक  नोंदवावा कारण याच क्रमांकावर तुम्हांला तुमचा स्वतःचा नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी आवश्यक असणारा Otp येणार आहे.  
मोबाईल क्रमांक अचूक नोंदवल्यानंतर त्यासमोरील Generate Otp वर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर तुम्हांला तुमच्या नोंदवलेल्या मोबाईल क्रमांक otp पाठविल्याचा संदेश येईल त्यास ok करा. 
तुमच्या नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर MAHEDU कडून otp चा msg (चार अंकी क्रमांक) आला असेल तो otp च्या जागी अचूकपणे नोंदवा. आता तुम्हांला कायमस्वरूपी लक्षात राहील व जो फक्त तुम्हांलाच माहीत असेल असा पासवर्ड New password च्या ठिकाणी नोंदवा व तोच पुन्हा confirm password च्या ठिकाणी नोंदवून Save टॅब वर क्लिक करा.
➡ आता तुमचे स्वतःचे  My profile हे पेज ओपन होईल. इथे My profile- Application - Request -Utility अशा Tab दिसून येतील व त्याखाली आपले स्वतःचे नाव, आपली पूर्वीची शाळा(ज्यांनी अद्याप change school request पाठवलेली नाही त्यांची)   अथवा सध्याची शाळा दिसून येईल. 

➡ वरील My profile टॅब मध्ये  General Details  या sub-tab वर क्लिक केले असता यापूर्वी असणारी माहिती व काही नवीन माहिती भरण्यासाठीची विंडो ओपन होते तिथे आवश्यक ती सर्व माहिती अचूक नोंदवून Save करा व खात्री करून Forward करा.
➡ बदलीने नवीन शाळेत हजर झाला असल्यास Request मधील school change request  या पर्यायावर क्लिक करा. आता स्क्रीनवर Transfer type हा पर्याय दिसतो त्यातील योग्य पर्याय( जिल्ह्यातच  असल्यास Inra- district व जिल्ह्याबाहेरून असल्यास inter -district) निवडा.
आता स्क्रीनवर डाव्या बाजूस तुमच्या यापूर्वीच्या शाळेची माहिती दिसेल व उजव्या बाजूस तुम्ही सध्या कार्यरत असलेल्या शाळेची माहिती अचूक नोंदवायची आहे.
 कोल्हापूर जिल्ह्यातच बदली असल्यास District- Block- cluster - school या बाबी अचूक निवडा.  व खात्री करून Submit बटनावर क्लिक करा.
 तुमची Change school request  ही पुढील कार्यवाहीसाठी EO लॉगिन ला गेलेली असते.  
➡ Eo लॉगिन स्तरावर कार्यरत व्यक्तीला  आवश्यक पुराव्यानिशी समक्ष भेटून सदर शाळा बदलण्याची रिक्वेस्ट अथवा इतर माहिती बदलण्याकरिता पाठवलेली रिक्वेस्ट verify करून घ्यावी. तेव्हाच तुमचे कार्य पूर्ण झाले असे समजावे.

➡ तुमचा data वेरीफाय झाल्यानंतर नवीन शाळेत नाव दिसते का हे school login मधून तपासावे. 

➡ महत्वाचे - ज्यांची बदली होऊन शाळा बदलली नसेल त्याही सर्व शिक्षकांनी वरील प्रक्रियेनुसार स्वतःच्या  Teacher Login करिता  पासवर्ड तयार करावा. व general details update(Save - Forward) करावे.

टीप - सदर सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत समजूतीनुसार कामाच्या सुलभतेकरिता देण्यात आली आहे. याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीवर कार्यवाही करावी.🙏

---आपला नम्र- श्री.सुनिल वि. अस्वले, पदवीधर अध्यापक केंद्रशाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा.

रविवार, १९ जानेवारी, २०२०

रविवार, ५ जानेवारी, २०२०

देणाऱ्याने देत जावे...

नमस्कार! HTM शैक्षणिक व्यासपीठ निर्मितीबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनस्वी अभिनंदन व आभार! तसेच  या विधायक शैक्षणिक कार्यास मनापासून सहकार्य करणारे व पाठिंबा देणारे आपण सर्व ज्ञात-अज्ञात, या व्यासपिठाच्या माध्यमातून आपणांस शैक्षणिक क्षेत्रात,विद्यार्थांत (विशेषत: वंचित,दुर्बल )काही सकारात्मक बदल घडवावयाचे आहेत.आपल्याच मित्रांच्या,त्यांच्या परिवार सदस्यांच्या वाढदिनाच्या मंगलमय प्रसंगात आपण सहभागी होत असताना,त्यांना शुभेच्छा देत सामाजिक भान जपण्याचे कार्य आपणांस या माध्यमातून करायचे आहे. स्वखुशीने मिळणा-या निधीच्या साहाय्याने वरील घटकांना शैक्षणिक साहित्याचा लाभ देणे या हेतुबरोबरच इतरही सर्व विद्यार्थी घटकाला प्रोस्ताहित करणेसाठी कार्य घडवायाचे आहे.शिक्षण घेणारे प्रत्येक मुल हे राष्ट्राच्या इमारतीच्या पायातील एक चिरा असतो.तो जर सर्वांगिण मजबूत,खंबीर,संस्कारी असेल तर एक संपन्न राष्ट्र उभे राहू शकते.सर्वांगिण या शब्दात बुद्धिच्या विकासासोबतच शरीर,मन,भावना,संवेदना,सामाजिकता यांचा विकास घडवणे अपेक्षित आहे.हा विकास निकोप व्हावयाचा असेल तर प्राथमिक स्तरापासून त्यात येणा-या समस्या तत्काळ दूर झाल्या पाहिजेत.या समस्या त्याच्या स्वत:च्या, कुटुंबातुन,शाळेतून,समाजातून व मित्र परिवारातुन असू शकतात.या समस्या समजावून घेवून  यातून योग्य त्या मार्गाने जसे की साहित्य वाटप,व्यक्तिमत्व विकास शिबिर ,पालक उद्बोधन,शाळा-शिक्षक भेट इ. आपणांस विद्यार्थ्यातील एक आदर्श मुल बाहेर आणायाचे आहे.
              वरचे मुद्दे फारच आदर्शवत वाटत असले तरीही 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला येऊ शकतात यावर माझा ठाम विश्वास आहे. यासाठी आपण स्वत: निवृत्तीनाथ व्हायचे आहे हे विसरुन चालणार नाही. जिजाऊ असेल तरच शिवराय घडतील,रामकृष्ण होते म्हणून विवेकानंद घडले,गोपालाकृष्ण गोखले होते म्हणून गांधी महात्मा झाले.चला तर आपणही संस्कारी नि पराक्रमी शिवराय घडवू, चारित्र्यवान विवेकानंद घडवू,संवेदनशील मनाचे महात्मा घडवू पण यासाठी स्वत: जिजाऊ,रामकृष्ण,नि गोखले व्हावे लागेल.
     चला तर एक नाविन्यपूर्ण बदल घडवुया! शैक्षणिक कार्यातून विद्यार्थी घडवुया,विदयार्थ्यातुन कुटूंब घडवुया,कुटूंबातून समाज नि समाजातून माझा आदर्श गाव नि माझ्या आदर्श गावातून आदर्श   देश घडवुया. धन्यवाद!----सुनील अस्वले (सुवर्णविलास)

(आम्ही आमच्या वडणगे,ता.करवीर या गावी उभारलेल्या शैक्षणिक व्यासपीठासंबंधी मी मांडलेले विचार.☝आनंदाची बाब अशी की या आमच्या कार्यास भरघोस पाठिंबा मीळत आहे.

* व्यासपीठाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास जर कुणाला वस्तू अथवा आर्थिक स्वरूपात हातभार लावायचा असेल तर नक्की मला माझ्या 9049211785 या व्हाट्सअप्प  क्रमांकावर सम्पर्क करा.*

राजकारणविरहित या  समितितील सदस्य म्हणून काम करताना मला विशेष आनंद होत आहे.)

देणाऱ्याने देत जावे...

नमस्कार! HTM शैक्षणिक व्यासपीठ निर्मितीबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनस्वी अभिनंदन व आभार! तसेच  या विधायक शैक्षणिक कार्यास मनापासून सहकार्य करणारे व पाठिंबा देणारे आपण सर्व ज्ञात-अज्ञात, या व्यासपिठाच्या माध्यमातून आपणांस शैक्षणिक क्षेत्रात,विद्यार्थांत (विशेषत: वंचित,दुर्बल )काही सकारात्मक बदल घडवावयाचे आहेत.आपल्याच मित्रांच्या,त्यांच्या परिवार सदस्यांच्या वाढदिनाच्या मंगलमय प्रसंगात आपण सहभागी होत असताना,त्यांना शुभेच्छा देत सामाजिक भान जपण्याचे कार्य आपणांस या माध्यमातून करायचे आहे. स्वखुशीने मिळणा-या निधीच्या साहाय्याने वरील घटकांना शैक्षणिक साहित्याचा लाभ देणे या हेतुबरोबरच इतरही सर्व विद्यार्थी घटकाला प्रोस्ताहित करणेसाठी कार्य घडवायाचे आहे.शिक्षण घेणारे प्रत्येक मुल हे राष्ट्राच्या इमारतीच्या पायातील एक चिरा असतो.तो जर सर्वांगिण मजबूत,खंबीर,संस्कारी असेल तर एक संपन्न राष्ट्र उभे राहू शकते.सर्वांगिण या शब्दात बुद्धिच्या विकासासोबतच शरीर,मन,भावना,संवेदना,सामाजिकता यांचा विकास घडवणे अपेक्षित आहे.हा विकास निकोप व्हावयाचा असेल तर प्राथमिक स्तरापासून त्यात येणा-या समस्या तत्काळ दूर झाल्या पाहिजेत.या समस्या त्याच्या स्वत:च्या, कुटुंबातुन,शाळेतून,समाजातून व मित्र परिवारातुन असू शकतात.या समस्या समजावून घेवून  यातून योग्य त्या मार्गाने जसे की साहित्य वाटप,व्यक्तिमत्व विकास शिबिर ,पालक उद्बोधन,शाळा-शिक्षक भेट इ. आपणांस विद्यार्थ्यातील एक आदर्श मुल बाहेर आणायाचे आहे.
              वरचे मुद्दे फारच आदर्शवत वाटत असले तरीही 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला येऊ शकतात यावर माझा ठाम विश्वास आहे. यासाठी आपण स्वत: निवृत्तीनाथ व्हायचे आहे हे विसरुन चालणार नाही. जिजाऊ असेल तरच शिवराय घडतील,रामकृष्ण होते म्हणून विवेकानंद घडले,गोपालाकृष्ण गोखले होते म्हणून गांधी महात्मा झाले.चला तर आपणही संस्कारी नि पराक्रमी शिवराय घडवू, चारित्र्यवान विवेकानंद घडवू,संवेदनशील मनाचे महात्मा घडवू पण यासाठी स्वत: जिजाऊ,रामकृष्ण,नि गोखले व्हावे लागेल.
     चला तर एक नाविन्यपूर्ण बदल घडवुया! शैक्षणिक कार्यातून विद्यार्थी घडवुया,विदयार्थ्यातुन कुटूंब घडवुया,कुटूंबातून समाज नि समाजातून माझा आदर्श गाव नि माझ्या आदर्श गावातून आदर्श   देश घडवुया. धन्यवाद!----सुनील अस्वले (सुवर्णविलास)

(आम्ही आमच्या वडणगे,ता.करवीर या गावी उभारलेल्या शैक्षणिक व्यासपीठासंबंधी मी मांडलेले विचार.☝आनंदाची बाब अशी की या आमच्या कार्यास भरघोस पाठिंबा मीळत आहे.

* व्यासपीठाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यास जर कुणाला वस्तू अथवा आर्थिक स्वरूपात हातभार लावायचा असेल तर नक्की मला माझ्या 9049211785 या व्हाट्सअप्प  क्रमांकावर सम्पर्क करा.*

राजकारणविरहित या  समितितील सदस्य म्हणून काम करताना मला विशेष आनंद होत आहे.)