खरे स्वातंत्र्य..
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...
आज साऱ्या देशभर मोठ्या उत्साहात 73 वा स्वातंत्र्य दिन संपन्न होत आहे. पण प्रत्येक भारतीयाने आत्मपरीक्षण करावे की खरंच आपण स्वातंत्र्यात आहे म्हणजे नेमके कशाचे स्वातंत्र्य आपण मिळवले नि कोणत्या गोष्टींचे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहे.
देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला अन आपण स्वतंत्र झालो तोच हा क्षण...पण खरेच आपण बंधमुक्त झालो आहोत का? परंपरागत आचार-विचार,चालीरीती,प्रथा-परंपरा यांनी आपल्या मनावर केलेले अधिराज्य आज नाहीसे झाले आहे का?पूर्वापार चालत आलेल्या समाजविघातक गोष्टींपासून आपण स्वतंत्र झालो आहोत का?
आधुनिकतेचा विचार करताना आपण स्वमताने आचरण करतो आहोत की पाश्चिमात्य विघातक संस्कृतीचे अनुकरण करतो आहोत? स्वातंत्र्यप्राप्ती नंतर आपण आपला भौतिक विकास साधला अन खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद गमावला हेच काय ते स्वातंत्र्य आपणांस गवसले.
स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मनास येईल तसे बंधमुक्त वागणे इतकी संकुचित भावना आपण गेली कित्येक वर्षे मनात जोपासली आहे.अन यातून नकळतपणे आम्ही सर्वजण एक हुकूमशाहीच जोपासत आहोत.माझ्या मनाप्रमाणे घडावे याकरिता आयुष्यात धडपडत राहणे हे आत्मकेंद्रित स्वातंत्र्य आम्ही आज उपभोगत आहोत.
आपली मते,विचार,आचार,हक्क याचे जरी आपल्यास स्वातंत्र्य असले तरी ते स्वतः उपभोगत असताना इतरांच्या याच बाबींचा विचार आपण फार कमी करतो.आपल्या विचार,आचार ,हक्कातून बहुतेक वेळा इतरांचे विचार, आचार ,हक्क बाधित होतात तेव्हा त्या स्वातंत्र्यास स्वातंत्र्य म्हणता येत नाही.या गोष्टीचा स्वतःच्या बाबतीत आपण जसा विचार करतो तसाच विचार इतरांच्या बाबतीत करून मानवतेची भावना जोपासणे हेच खरे स्वातंत्र्य.
स्वातंत्र्याचा स्वार्थ केला तर काय होते हे निसर्गानेही वेळोवेळी आपणांस दाखवून दिले आहे.स्वतःच्या हव्यासापोटी आपण निसर्गाला ओरबाडत राहिलो.निसर्गाच्या कुशीत राहून ,त्याचा अनिर्बंध उपभोग घेऊन त्याच्या स्वातंत्र्यावर आपण मानव गदा आणत आहे. परिणाम स्वरूप तो वेळोवेळी रौद्ररूप धारण करून आपणांस सूचित करत आला आहे.निसर्गाच्या प्रत्येक घटकाचे अस्तित्व जसेच्या तसे टिकवून ठेवणे म्हणजेच निसर्गाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे.
एकंदरीत निसर्गाचा आदर करीत मानवतेची भावना जोपासणे म्हणजे खरे स्वातंत्र्य उपभोगणे.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा!!!
जयहिंद!!!
✍ सुवर्णविलास दि.15/08/19