बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

खरे स्वातंत्र्य

  खरे स्वातंत्र्य..

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...
          आज साऱ्या देशभर मोठ्या उत्साहात 73 वा स्वातंत्र्य दिन संपन्न होत आहे. पण प्रत्येक भारतीयाने आत्मपरीक्षण करावे की खरंच आपण स्वातंत्र्यात आहे म्हणजे नेमके कशाचे स्वातंत्र्य आपण मिळवले नि कोणत्या गोष्टींचे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहे.
देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला अन आपण स्वतंत्र झालो तोच हा क्षण...पण खरेच आपण बंधमुक्त झालो आहोत का? परंपरागत आचार-विचार,चालीरीती,प्रथा-परंपरा यांनी आपल्या मनावर केलेले अधिराज्य आज नाहीसे झाले आहे का?पूर्वापार चालत आलेल्या  समाजविघातक गोष्टींपासून आपण स्वतंत्र झालो आहोत का?
            आधुनिकतेचा विचार करताना आपण स्वमताने आचरण करतो आहोत की पाश्चिमात्य विघातक संस्कृतीचे अनुकरण करतो आहोत? स्वातंत्र्यप्राप्ती नंतर आपण आपला भौतिक विकास साधला अन खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद गमावला हेच काय ते स्वातंत्र्य आपणांस गवसले.
               स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या मनास येईल तसे बंधमुक्त वागणे इतकी संकुचित भावना आपण गेली कित्येक वर्षे मनात जोपासली आहे.अन यातून नकळतपणे आम्ही सर्वजण एक हुकूमशाहीच जोपासत आहोत.माझ्या मनाप्रमाणे घडावे याकरिता आयुष्यात धडपडत राहणे हे आत्मकेंद्रित स्वातंत्र्य आम्ही आज उपभोगत आहोत.
आपली मते,विचार,आचार,हक्क  याचे जरी आपल्यास स्वातंत्र्य असले तरी ते स्वतः उपभोगत असताना इतरांच्या याच बाबींचा विचार आपण फार कमी करतो.आपल्या विचार,आचार ,हक्कातून बहुतेक वेळा इतरांचे विचार, आचार ,हक्क बाधित होतात तेव्हा त्या स्वातंत्र्यास स्वातंत्र्य म्हणता येत नाही.या गोष्टीचा स्वतःच्या बाबतीत आपण जसा विचार करतो तसाच विचार इतरांच्या बाबतीत करून मानवतेची भावना जोपासणे हेच खरे स्वातंत्र्य.
                स्वातंत्र्याचा स्वार्थ केला तर काय होते हे निसर्गानेही वेळोवेळी आपणांस दाखवून दिले आहे.स्वतःच्या हव्यासापोटी आपण निसर्गाला ओरबाडत राहिलो.निसर्गाच्या कुशीत राहून ,त्याचा अनिर्बंध उपभोग घेऊन त्याच्या स्वातंत्र्यावर आपण मानव  गदा आणत आहे. परिणाम स्वरूप तो वेळोवेळी रौद्ररूप धारण करून आपणांस सूचित करत आला आहे.निसर्गाच्या प्रत्येक घटकाचे अस्तित्व जसेच्या तसे  टिकवून ठेवणे म्हणजेच निसर्गाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे.
                     एकंदरीत निसर्गाचा आदर करीत मानवतेची भावना जोपासणे म्हणजे खरे स्वातंत्र्य उपभोगणे.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनस्वी हार्दिक    शुभेच्छा!!!

                     जयहिंद!!!

✍ सुवर्णविलास दि.15/08/19

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

हे मेघराजा

हे मेघराजा...

होती कोरड घशाला
अन होता घोर जीवाला
म्हणून तर हे मेघराजा
आर्त हाक मी दिली तुला..

विनविता तुला तू
आलास धावून
अन सुखावले तेव्हा
माझे  मन

जलधारांनी तुझ्या मी
अवघा तृप्त नहालो
अन खर सांगतो मनात
मी खूपदा हसलो..

आनंदाचे तोरण बांधिले
आषाढ-श्रावण मासाला
आनंदाचे उधाण आले
अवघ्या माझ्या मनाला

पण तू काहीच नाही जाणले😔

मोह तुझ्या बरसण्याचा
वाटतो उगाच मी केला
हर्ष तुझ्या आगमनाचा
उगा मनी माझ्या झाला...

उगाच केले तुझ्या
स्वागताचे सोहळे उरात
उगाच बांधले आनंदाचे
तोरण मना-मनात...

वाहून नेलीस सारी स्वप्ने
अन रोविलेस दुःख उरात
शिरलास तू घराघरात
अन पाणी साऱ्या नयनात

पण सांगतो तुला ऐक माझे

ढासळल्या जरी घराच्या भिंती
ढासळलेल्या नाहीत इथे
माणुसकीच्या भिंती

आहे लढण्याची जिद्द
अजून माझ्या हृदयात
राहीन उभा पुन्हा मी
अन करेन पुन्हा तुझे
स्वागत

अन करेन पुन्हा तुझे
स्वागत ......

✍ सुवर्णविलास दि.09/08/19
www.suvarnvilas.blogspot.com

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

निसर्गाचा आदर करूया..

1989 साली वय वर्ष 9 असताना महापुराची ही स्थिती वडिलांच्या हाताला धरून पाहिली होती. त्यानंतर 2005 साली स्वतः जाऊन पाहिली.पण सध्याच्या इतकी भयावह अवस्था तेव्हा वाटली नाही.3 ते 4 दिवसांत पूर ओसरून जनजीवन पूर्वपदावर येत होते.सायकल वर स्वार होऊन पुराच्या पाण्यातून वाट काढीत कोल्हापूरला जाणे होत होते.पण सध्या हे शक्यच नाही. पुराचे पाणी इतके दिवस अन इतक्या उंचीवर राहत नव्हते.   याहीपेक्षा दमदार पाऊस व्हायचा. पण पाण्याचा असा फुगवटा कधी यायचा नाही.सध्याच्या अशा स्थितीला नेमके जबाबदार कोण?आपण निसर्गावर आक्रमण केले तर तो ते नक्कीच परतवून लावणारच. अजूनही वेळ गेलेली नाही.निसर्गाचा आदर करूया.विकासाच्या नावाखाली त्याच्याशी छेडछाड नको.🙏
✍ सुवर्णविलास
दि.07/08/2019
www.suvarnvilas.blogspot.com

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

पावसास...

*पावसास...*

तृषार्त मनाची हाक ऐकून
जलधारांनी चिंब भिजवित बरसलास तू या तप्त धरेवर
अन हर्ष तयाने झाला मनात

आगमनाने तुझ्या सुखावले सारे
अंकुरले हिरवे स्वप्न मनी  
तृप्त झाले कडे-कपारी अन डोंगर सारे
सुखावले सारी जन अन सृष्टी मनोमनी

बघता बघता हे दिस सरले
अन स्वप्न सुखाचे विरले सारे
तुझ्या बरसण्याचा लागेना ठाव
अन वाहून जाऊ लागलेय सुख सारे

नको पाहूस अंत आता
बरसू नकोस थांब आता
विनवितो आम्ही अवघे तुला
घे विसावा थोडा आता...

✍ © सुवर्णविलास
     दि.05/08/19