रविवार, २८ जुलै, २०१९

हे ही घडवूया

सगळ्यांनाच सगळं यावं
जमेल हेही करता प्रयास...
घडवूया राजहंस सारे
घेतील भरारी नभात
अन लुटतील आनंद पोहण्याचा पाण्यात..

रेखाटण्यास देऊ त्याला
कवितेच्या ओळी रेखीव
रंग भरण्यास देऊ संधी
कवितेच्या चालीत....

मोत्यासारखे अक्षर अन
करतो हिशोब तोंडी भरभर
मग देऊया त्याला विश्वास
येतील पाढेही भरभर

आनंददायी उपक्रमांनी
राहणार नाही गणिताची भीती
गणिताच्या स्पर्धेतही
जिंकेल माझी बोलघेवडी

इंग्रजीतील खेळ खेळून सुसाट
सरसर चढेल तो knowledge चे झाड

वाचणाऱ्या कृष्णाच्या मनात
जागवू लिहिण्याचाही विश्वास
आज नाही उद्या लिहील
पण करूयात आपण प्रयास

विविधांगी लेकरांना
आणूया एकाच स्तरात
त्यांचे अंग जपताना
घडवूया समान विकास

वाचन ,लेखन ,गणितासोबत
देऊ जीवनाचे शिक्षण खास
त्याच्याच कलाने जाऊन
करूया त्याचा आपण विकास

नकारघंटा नकोच आधी
करूया कार्याची सुरुवात
जमेल जितके तितके करूया
अडेल तिथे हात देऊया
*सर्वांगिण विकास* करून त्याचा
घडवू आपुला विद्यार्थी छान।

✍ © सुवर्णविलास
दि.26/07/2019

सोमवार, १५ जुलै, २०१९

गुरुवंदन

🙏*गुरुवंदन*🙏

मानवी जीवनात गुरूला अनन्य साधारण महत्त्व आहे.अनादी काळापासून समस्त विश्वात गुरूला सर्वोच्च स्थान असल्याचे दिसून येते. जन्मापासून अंतापर्यंत आयुष्याला आकार देणारे,अनुभव देणारे सृष्टीतील सर्व घटक हे माणसाच्या गुरूस्थानी असतात. 'गुरुविण कोण दाखवील वाट' या उक्तीप्रमाणे गुरू हा आपल्या आयुष्याला सकारात्मक आकार देतानाच आपल्या जीवनाचे मार्गक्रमण योग्य दिशेने घडवून आणण्यासाठी सतत शिष्यासोबत असतात.
      माझ्या आजच्या यशस्वी, आनंददायी आयुष्याच्या पाठीशी मला आजवर लाभलेले गुरू आहेत. जन्मानंतर माझ्या आयुष्याला आकार देणारी,मला जीवन दिलेली माझी आई व माझे वडील हे माझे आद्यगुरू आहेत.
माझ्या जीवनाची पायाभरणी  करणारे माझे आई-वडील हे आजही माझ्या आयुष्याच्या प्रवासातील दीपस्तंभ आहेत.त्यांचे आशीर्वाद अखंडपणे माझ्या पाठीशी राहावेत म्हणून मी त्यांच्या नावातून आकारलेले 'सुवर्णविलास' हे टोपणनाव धारण केले आहे.  लहानापासून आजअखेर आयुष्याचे मार्गक्रमण करत असताना माझी भावंडे माझ्या सोबतीला राहून त्यांनी माझ्या सुखदुःखात मला साथ दिली.शिक्षण घेताना ते मला प्रेरणा ठरले. बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत मला लाभलेले सर्व शिक्षक हे माझ्या गुरुस्थानी आहेत. नोकरीच्या कार्यकाळात आजअखेर पेशाशी प्रामाणिक,निर्व्यसनी, कालसुसंगत व समाजभान जपणारे अनेक अधिकारी,सहकारी शिक्षक ,काही कर्मचारी माझ्या जीवनात मला लाभले.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आज माझी शिक्षक म्हणून या क्षेत्रातील  वाटचाल यशस्वी होत आहे. हे सर्वच जण अखंडपणे माझ्या गुरुस्थानी आहेत. आणि ज्यांच्यामुळे मी आज शिक्षक म्हणून कार्यरत आहे तो माझा नोकरीच्या सुरुवातीपासून आज पर्यंतचा विद्यार्थी हाही माझा गुरू आहे.प्रेम,आपुलकी,आदर याचा ठेवा जीच्याठायी आहे,जी नित्य ,वेळोवेळी माझ्या आयुष्याला समृद्ध करत आहे ती माझी अर्धांगिनी सौ.दिपाली ही देखील मला लाभलेली माझा गुरू आहे.  माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो.आपल्या अवती-भवती असलेल्या सर्वच गोष्टीतून तो नित्य शिकत असतो.या निसर्गातील प्रत्येक घटक हा माझा गुरू आहे. मला माझ्या जीवनात लाभलेल्या या सर्व ज्ञात व अज्ञात घटकांना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी मनोमन वंदन करतो!

-✍ सुनिल विलास अस्वले.पदवीधर शिक्षक -केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा
रा.वडणगे,ता.करवीर.
मोबा.९०४९२११७८५

बुधवार, १० जुलै, २०१९

खेळातून संख्याज्ञान

खेळातून संख्याज्ञान
इयत्ता - 5 वी
विषय - गणित
घटक - संख्याज्ञान व इतर क्रिया.

साहित्य - 0 ते 9 अंकांच्या कागदी चिठ्या अथवा पत्ते.

कृती - विद्यार्थ्यांना वैयक्तिक अथवा गटाने 0 ते 9 अंकाच्या चिठ्या एकत्रित करून उडवण्यास सांगाव्या.आता यातील कोणत्याही सहा चिठ्या उचण्यास सांगाव्या. ज्या क्रमाने विद्यार्थी चिठ्या उचलतील त्याच क्रमाने त्यांना अंक लिहिण्यास सांगावे. उदा.पहिली चिट्ठी 5 , त्यांनंतर अनुक्रमे 4,7,0,8,3 अशा चिठ्या आल्या तर त्यापासून तयार होणारा अंक 5,47,083 असा होईल. यात एकच अंक पुन्हा यावा याकरिता उचललेली चिट्ठी पुन्हा उडवलेल्या ढिगात मिसळावी.
     यापद्धतीने अंक तयार झाल्यानंतर पुन्हा सर्व चिठ्या एकत्रित करून पहिल्या प्रमाणेच कृती करत राहावी.या पद्धतीने विद्यार्थ्यांना स्वतः  अनेक संख्या तयार करून त्याचे लेखन व वाचन करता येईल व त्यातून संख्या वाचनाचे दृढीकरण होईल.
     या कृतीतून तयार होणाऱ्या नवनवीन संख्यांची काठिण्यपातळी नुसार अंकांची संख्या निश्चित करून त्यांची  बेरीज/वजाबाकी/ गुणाकार अथवा भागाकार या क्रियाही करून घेता येतील.

सात अंकी संख्यांची ओळख,लेखन व वाचन तसेच संख्याचा लहान - मोठेपणा या  घटकाकरिता देखील या कृतीचा वापर करून खेळातून गणिती घटकांचा सराव व दृढीकरण करता येईल.

चिठ्यांच्या क्रमात सर्वात आधी 0 ची चिट्ठी आली तर ती वगळून पुढील चिठ्ठीत येणारी संख्या प्रथम घ्यावी.

चिठ्यांऐवजी पत्ते टाकूनही सदर खेळ घेऊन कृती करता येते.

✍ श्री.सुनिल अस्वले. पद.अध्या. केंद्र शाळा दळवेवाडी,ता.पन्हाळा.

मंगळवार, ९ जुलै, २०१९

आठवणीतील पाऊस

आठवणीतील पाऊस

पाऊस म्हंटलं की मनात आठवणींचा पूर आल्याशिवाय राहत नाही. समस्त सृष्टीला भिजवणारा पाऊस माणसाच्या मनालाही  आठवणींनी भिजवतो. माझ्या आयुष्यतील असाच एक पाऊस की ज्याने आम्हां उभयतांच्या नवजीवनाच्या प्रारंभी आपल्या जलाभिषेकाने आम्हांला जणू आशीर्वादच दिला तो बेभान होऊन कोसळलेला पाऊस मला आजही  आठवतो. 22 जून 2003 हा आमच्या लग्नाचा मुहूर्त. दोन्हीकडील कुटुंबात आनंद ओसंडून वाहत होता. अन त्या सोबतीला अधूनमधून थोडी विश्रांती घेत बरसणारा पाऊसही होता.वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतापासूनच अवघी सृष्टी चिंब न्हाऊन गेली होती. सकाळी देवदर्शनसमयी उजाडलेल्या या वरुणराजाने लग्नमंडपात हळदीच्या प्रसंगी आपली हजेरी लावलीच.सौभाग्यवतीच्या शिरावर छत्र धरूनच हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यांनतर पुन्हा काही क्षण विश्राती घेतलेल्या वरुणदेवाने ऐन अक्षताच्या समयी पुन्हा असा जोरदार जलवर्षाव सुरू केला की वाटले तो ही आपल्या करांतून जलरूपी अक्षता आम्हां उभयतांच्या शिरावर  टाकून आमच्या सुखी संसाराकरीता आशीर्वाद देत आहे. पण त्याचा जोर इतका होता की लग्नास उपस्थित राहिलेल्या सर्व आप्तेष्ट,मित्रमंडळी,ग्रामस्थ यांना त्याने चिंब करून टाकले होते.सुमारे तासभर अखंड कोसळणाऱ्या या पावसाने उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाला लग्नाच्या हॉल मध्येच खिळवून टाकले. आजही जेव्हा माझ्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकजण त्या पावसाला आठवल्याशिवाय राहत नाहीत. मलाही आमच्या लग्नास मुहूर्तावर उपस्थित राहिलेला अन मला माझ्या जीवनात सौभाग्यवतीच्या रूपाने भरभरून आनंद,प्रेम मिळवून दिलेला तो  पाऊस अन दिवस आजही मनात ओथंबून येतो.
© सुनिल अस्वले.