रविवार, ४ डिसेंबर, २०१६

चला विषमता नष्ट करुया...

*चला विषमता नष्ट करुया!*

*कुणा ना तुच्छ लेखावे*
*समस्ता बंधू मानावे..*
पूज्य सानेगुरुजींच्या खरा तो एकचि धर्म... या प्रार्थनेतील या ओळी समस्त मानवांमध्ये एकात्मतेची भावना जोपासण्याचा संदेश देतात. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमाच्या दहा गाभाघटकांत *राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्याचा* उल्लेख केला आहे. *भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतही दर्जाची व संधीची समानता तसेच राष्ट्राची एकता व एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार केला आहे.* एकंदरीत सर्वच ठिकाणी सामजिक,धार्मिक,जातीय ,लिंगभेद,आर्थिक,शैक्षणिक तसेच राजकीय स्तरातील आढळणारी विषमता नाहीशी करण्याचा प्रयास केल्याचे दिसून येते. या सर्व स्तरातील विषमता पूर्णपणे नष्ट झाल्याखेरीज राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न पूर्णत्त्वास जाणे अशक्यप्राय आहे.
           *संतांपासून ते शाहू-फुले-आंबेडकर या समाजोद्धारकांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील विविध प्रकारची असणारी ही विषमता नष्ट करण्यास व्यथित केले.*केवळ शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतीतून यांनी विषमतेवर जोरदार प्रहार केले. तथकथित सनातनी धर्मरक्षकांनी याविरुद्ध प्रचंड आरडाओरड केली.यांतून शाहू-फुले,आंबेडकर या त्रयींना खूप त्रास सहन करावा लागला. वेदोक्त प्रकरण,घरचा त्याग, शुद्र म्हणून जिथे-तिथे हेटाळणी अशा अनेक प्रकारांना यांना सामोरे जावे लागले. पण तरीही आपल्या कार्यापासून तसुभरही न डगमगता हाती घेतलेले समाजोद्धाराचे कार्य या सर्वांनी निस्वार्थपणे केले. याचेच फलित म्हणून भारतीय राज्यघटनेत वर नमुद केलेल्या सर्व स्तरातील विषमता नष्ट होण्यासाठी विभिन्न कलमांचा समावेश केला आहे.
               तथापि *केवळ कायदे करून परिवर्तन घडत नाही.* स्वातंत्र्यानंतर, राज्यघटना अंमलात आणल्यानंतरही उपरोक्त क्षेत्रातील विषमता नष्ट झाली असे अजिबात नाही. देशभरात अनेक ठिकाणी  धार्मिक,जातीय,राजकीय कारणांवरून होत असलेल्या दंगली, गरीब-श्रीमंत यांत रुंदावणारी दरी, शिक्षणाचे होत असणारे बाजारीकरण,राजकारणातील ध्रुवीकरण,स्त्रियांवर होणारे अत्याचार, समाजातील मुलींचे प्रमाण हे सर्व पाहता वर्तमान समाजात अद्यापही भयानक विषमता असल्याचे जाणवते.ही विषमता नष्ट करण्याचा एकमेव उपाय म्हणजे *स्वयंशिस्त* हाच आहे. सामजिक,धार्मिक,जातीय ,लिंगभेद,आर्थिक,शैक्षणिक तसेच राजकीय स्तरात विवेकाचा,संस्कृतीचा  आचार हीच  स्वयंशिस्त होय जी प्रत्येक नागरिकाने आपल्या मनाला लावून घेतली पाहिजे.सर्वच ठिकाणी आपणच श्रेष्ठ असावे,आपलाच लाभ व्हावा, गरजेपेक्षा अधिकची लालसा या गोष्टी विकृतीचे लक्षण आहेत याउलट प्रत्येकास आवश्यक्तेनुसार मिळावे ही भावना जोपासणे
हे संस्कृतीचे ,विवेकाचे लक्षण मानावे. आशा विवेकपूर्ण वर्तनाचा प्रत्येकाने अंगीकार करून समाजातील सर्वच विषमता नष्ट करता येईल. नि ख-या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साकारली जाईल.

✍�*�--- *सु* वर्ण *वि*लास *4*©

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा