☘🍁🍂🍀🌱
*भावलेले काही*
☘🍁🍂🍀🌱
सर्वांना उपयुक्त लेख... प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा..
🌹 *'मोबाईल पार्किंग'*
*लेखक*- विश्वास सुतार
'मोबाईल पार्कींग' हे शीर्षक वाचून आपणास अनपेक्षित धक्का बसला असेल ना? खरी गोष्ट आहे.आपण फोर व्हीलर, टू व्हीलर, सायकल अशा वाहनांच्या पार्किंग (वाहनतळ) बद्दल जाणून आहोत. परंतु 'मोबाईल पार्किंग' ही काय भानगड आहे ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. ही नवी संकल्पना नव्या शतकाची, नव्या युगाची, नव्या तंत्रज्ञानाची आणि माणूस म्हणून जगण्यासाठी गरज म्हणून समोर येत आहे.
तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या(आंतरजालीय) युगात 'मोबाईल पार्किंग' ही संकल्पना रुढ होणे अत्यावश्यक ठरणार आहे. काळ पुढे सरकत आहे. आपण वेळीच सावध होऊन तंत्रज्ञान मायाजालाच्या आहारी न जाता तंत्रज्ञानाला काबूत ठेवू तर आपला विकास निश्चित आहे, आपलं जगणं स्वस्थ होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध असण्याचे कारण नाही. परंतु हे एक दुधारी शस्त्र आहे, हे आपण समजून घेऊया.त्याचा उचित आणि पुरेसा वापर करू, तर ते लाभदायी ठरणार आहे. याऊपर तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर हा आपल्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे. मोबाईल ही तर आधुनिक तंत्रज्ञानातील क्रांतीच आहे. मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक *अविभाज्य भाग* होत आहे.
मोबाईल ने आपल्या जन्माची पंचेचाळीशी गतवर्षी (सन२०१८ साली) पूर्ण केली. जगातील पहिला मोबाईल १९७३ साली मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी विकसित केला. मराठीत याला 'भ्रमणध्वनी' असे म्हणतात.संभाषण व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी मोबाईलचा सर्रास आणि आणि प्रभावी वापर होतो. टेलिफोन हा एकाच जागी स्थिर असायचा, अजूनही काही ठिकाणी दिसतो. त्याच्याकडे माणसांना जावे लागते... परंतु मोबाईल हा सहज हाताळता येतो. खिशात, पर्समध्ये तो आरामपणे विराजमान होतो. तो माणसांपर्यंत जातो, अगदी स्नानगृहातही!.. तर अशा मोबाईलचा प्रसार झपाट्याने होत आहे.एकमेकांशी कनेक्टेड राहिल्याने माणसाच्या भावना सुखावतात.याऊलट डिस्कनेक्ट परिस्थिती माणसाला नकोशी वाटते. आपले नातेवाईक, कुटुंब, मित्र, सहकारी यांच्याशी मोबाईल नेटवर्किंग च्या माध्यमातून सहज संपर्कात राहता येते.किती अद्भुत निर्मिती आहे मोबाईलची!.. माणूस एकाद्या साधनात गरजेनुसार किती सोयी वाढवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोबाईल ! एकेकाळी फक्त बोलण्यासाठी, संभाषणासाठी वापरला जाणारा मोबाईल आज नवनव्या एप्लीकेशन द्वारे बहुतांशी सुविधा आपल्या खिशात देतोय.
खरंतर मोबाईल आणि त्यावरील इंटरनेटच्या माध्यमातून *त्वरित संभाषण आणि कामाचा वेग वाढून आपल्याकडे इतर कृतिशील गोष्टी करण्यासाठी खूप वेळ शिल्लक राहावा*, असे अपेक्षिले होते.परंतु वास्तव अगदी विचित्र दिसून येते. मोबाईल तंत्रज्ञानाने आपल्याभोवती विलक्षण विळखा घातलेला आहे. मोबाईल फोन हरवला, तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असला,त्याची बॅटरी संपली, किंवा सिमकार्डवरील रिचार्ज संपला असेल तर आपली काय अवस्था होते ? निश्चितच आपण अस्वस्थ होतो. आपणास चैन पडत नाही. असे अस्वस्थ होणारे लोक ५३ टक्के आढळतात. ही टक्केवारी दिवसेंदिवस वाढतच आहे.आज घडीला तरुण लोक मोबाईल आणि इंटरनेटचा वापर दिवसभरातील ७ तास ३८ मिनिटे करतात,असे दिसून आले आहे. 'पबजी' सारखे खेळ मुलांच्या जीवावर कसे उठतात ते आपण पाहतच आहोत.शहरातील रस्त्यांवर, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन वा दवाखान्याच्या वेटिंग रूम मध्ये आपणास काय चित्र दिसते ? प्रत्येक जण मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे लावून बसलेला असतो. इतकेच काय, गावोगावचे कट्टेही हास्यविनोदाच्या चर्चेऐवजी मोबाईलच्या आहारी जात असल्याचे दिसत आहेत.
माणूस हा सवयीचा गुलाम आहे.एकदा का तो एखाद्या सवयीच्या आहारी गेला, की बाहेर पडणे मुश्किल ! मोबाईलची सवयही माणसाला गुंतवून ठेवते. साहजिकच मोबाईलशी वारंवार चाळा केल्याशिवाय अशा माणसाला राहवत नाही.. वरचेवर आपल्याला एखादा मेसेज किंवा कॉल तर आला नसेल ना,असे वाटल्याने मोबाईलकडे सतत पाहिले जाते.वारंवार इंटरनेट, यूट्यूब, व्हॉट्सऍप वापरल्याने आपली एकाग्रता कमी होताना दिसते. आपला स्वभाव हायपर होतो. निद्रानाशाचा विकार सुरू होतो. 'मल्टिटास्किंग' च्या नादात आपण एकावेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि एकही गोष्ट परिपूर्ण होत नाही. यातून पदरी निराशा येते.
आपण एखादा मेसेज शेअर केला असेल तर त्याच्या प्रतिसादाची आपण वाट पाहतो.वारंवार आपल्या मोबाईल फोनची बटनं दाबत राहतो.प्रतिसाद येत नाही तोपर्यंत आपलं सगळं लक्ष मोबाईलवरच असते. त्यातूनही अपेक्षित वेळेत प्रतिसाद नाही आला तर आपली चिडचिड वाढते.हा 'टेक्स्टोनिया' नावाचा नवा रोग दाखल होतोय...
कोणत्याही साधनाचा उपयोग माणसाने गरजेनुरूप आणि संयमाने केला तर तो अधिक फलदायी ठरतो, हे खरं आहे. पुरेसा वापर करून अशी साधने विशिष्ट ठिकाणी काही वेळ ठेवून देणे माणसासाठी आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे.आपल्या अशा अनेक वस्तू आपण ज्या त्या ठिकाणी ठेवत असतो. एका अर्थाने त्यांचे आपण पार्किंगच करत असतो. आपणास टेक्नॉलॉजी 'डाएट' करावयाचे असेल तर तंत्रज्ञानातील मोबाईलसाठी पार्किंग असणे आवश्यक आहे.वेगवेगळ्या कंपन्या सध्या असा विचार करत आहेत. सकाळी दहा, दुपारी दोन आणि संध्याकाळी चार/ पाच वाजता,अशा तीनच वेळा कर्मचाऱ्यांना मोबाईल हाताळण्यासाठी दिला जातो.त्यामुळे उर्वरित वेळात कर्मचारी पूर्णवेळ कामात समरस होताना दिसतात.निरनिराळ्या शासकीय कार्यालयात अशी योजना राबवायला हरकत नाही. शाळांमध्ये तर ती अत्यावश्यक वाटते. अध्ययन- अध्यापनात तल्लीनता येत असताना मोबाईल अडथळा ठरू शकतो. म्हणून मुख्याध्यापकांनी एक बॉक्स बनवून त्यामध्ये मोबाईल पार्किंग करण्यास सुरुवात करावी.शिक्षकास अध्यापनात पूरक म्हणून मोबाईल वापरावयाचा असल्यास मोकळेपणाने परवानगीही द्यावी..आपल्या घरी आपण काय करू शकतो ? मोबाइल आणि त्यावरील एप्लिकेशन्स *वापरावयाच्या वेळा* आपण निश्चित करू आणि इतर वेळी घरामध्ये असे एक ठिकाण करू जिथे आपला मोबाईल सुरक्षित पार्क होईल. अशाने तोही 'हँग' होणार नाही.रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी आपले मोबाईल पार्किंग व्हावेत. ते ऊशाला असू नयेत. एखाद्या छानशा पुस्तकाची चार पाने आपण वाचावीत आणि गाढ झोपी जावे.सकाळीही डोळे चोळत मोबाईलशी चाळा करण्यापेक्षा व्यायाम, अंघोळ अशा ऊर्जा देणाऱ्या गोष्टी करून पार्किंग मधल्या मोबाइलला हाती घ्यावं. काही दिवस आपल्याला थोडा त्रास होईल.परंतु मोबाईल पार्किंग करण्याची आपल्याला एकदा का सवय झाली,तर *जिथे रेंज नाही अशा ठिकाणी सहल काढायचा विचार* आपल्या मनात निश्चितच येणार नाही. चिडचिडेपणाने मोबाईल फेकावासा वाटणार नाही. तंत्रज्ञानाच्या नव्या युगात मोबाईलचा द्वेष करण्यापेक्षा आपण त्याचा विवेकाने वापर करून आपलाच फायदा करून घेऊया. चला तर, मोबाईल पार्कींगच्या तयारीला.. !
✍ विश्वास सुतार(शिरगाव)
कोल्हापूर
शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. करवीर
👉९४२०३५३४५२
👉 suvishw73@gmail.com
*Forwarded*
☘🍁🍂🍀🌱
Sunil Aswale www.suvarnvilas.blogspot.com
9049211785
sunilaswale80@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा