रविवार, २४ डिसेंबर, २०१७

सुचलेले काही 23/12/17

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                            दि.23/12/2017

              काल शालेय परीपाठात 3 री च्या विद्यार्थ्यांनी मैत्री या विषयावरील बोधकथा सांगितली.या बोधकथेचे तात्पर्य ,माणसे केलेली मैत्री विसरतात पण प्राणी मैत्री विसरत नाहीत असे सांगितले. बोधकथेचे तात्पर्य ऐकून थोडेशे आश्चर्य वाटले. योगायोगाने सहावीच्या वर्गात तासिकेला News Flash या घटकात पेंग्विनच्या मैत्रीचा किस्सा स्पष्ट करताना परीपाठातील बोधकथेचेच तात्पर्य जाणवले.रिओ दे जानेरोच्या समुद्रकिना-यावर राहणा-या माणसाशी 4 महिन्यांचा असताना मैत्री झालेला हा पेंग्विन पक्षी मोठा झाल्यावरही दरवर्षी आपल्या या मानवी मित्रास भेटण्यास जवळपास 8000 किमी अंतर पाहून येत असे. माणूस नि प्राणीमात्राच्या मैत्रीचे असे अनेक अजब किस्से नेहमीच ऐकायला मिळतात.यांतून हे स्पष्ट होते की प्राणी एकदा केलेली मैत्री कधीही विसरत नाहीत.याऊलट माणूस आपले मैत्री काळाच्या ओघात सहज विसरून जातो.जीवनाच्या प्रत्येक नवीन टप्प्यावर नवे मित्र जोडले जातात व यापूर्वीचे विसरले जातात.
            हे किती सहज घडते याचे खरे तर नवल वाटते.पण हे घडते हे सत्य नाकारताही येत नाही.ज्या माणसांची परस्परांशी निर्माण होणा-या मैत्रीचा पाया हा एकमेकांची केली जाणारी स्तुती, होणारी मदत, होणारा फायदा हाच असतो तेथे अशी मैत्री तेवढ्यापुरतीच असते.अशाप्रकारच्या मैत्रीत जेव्हा या अपेक्षांची पुर्तता होत नाही तेव्हा ही मैत्री सोयीस्करपणे दुर्लक्षित केली जाते व कालांतराने विसरलीही जाते व नव्याने नव्या ठिकाणी याच दृष्टीने प्रस्थापित केली जाते.याप्रकारची मैत्री ही संख्यात्मक दृष्ट्या अनेकांशी निर्माण होते.अशा मैत्रीत सांगायला मित्र भरपूर असतात.पण यात ख-या मित्राचा अंतर्भाव असत नाही.
              खरी मैत्री ही तुलनेने फारच कमी व्यक्तीशी ,कदाचित एखाद्याच मित्राशी आपसूक जन्माला येते.अशी मैत्री ही निरपेक्ष भावनेमुळे आजन्म विसरली जात नाही.मित्राकडून कोणत्याही *अपेक्षेविना निर्माण झालेली ही मैत्री आयुष्यात एकमेवद्वितीय असते.*इतर कोणीही कितीही जणांनी मैत्रीची साद घातली तरी मन मैत्रीस तयार होत नाही. जेव्हा आयुष्यात कोणाबरोबर अशी मैत्री जडते तेव्हा ती हृदयापासून जडलेली असते. अशा मैत्रीत कोणत्याही प्रकारचे मतभेद असत नाहीत. *विचार व भावनेच्या समानतेवर एकत्र आलेले हे मित्र परस्परांचा आदर ठेवत एकमेकांसाठी दिपस्तंभाची भूमिका बजावतात.* योग्य दिशादर्शन करून परस्परांच्या जीवनाचे उन्नयन घडवून आणणे ही भावना अशा मैत्रीत अंतर्भूत असते.याकरीता वेळप्रसंगी योग्य बाबतीत प्रशंसा व अयोग्य बाबतीत खडसावणे ही भूमिका जपली जाते.
            पण तरीही अशी मैत्री परस्परांपासून दुरावली जात नाही उलट अशा प्रसंगांतुन या मैत्रीचे ऋणानुबंध अधिकच दृढ़ होत जातात कधीही न तुटण्याकरीता.अशा मैत्रीने जीवन ख-या अर्थाने आनंदी नि उत्साही राहते.जिवनातील कितीही कठीण प्रसंगात असताना अशा मित्राचे असणे म्हणजे वाळवंटात तहानेने व्याकुळ पथिकास ओअँसीस दृष्टीपथास पडणे असते.अशाच एका msg मध्ये मैत्रीबद्दलच्या भावलेल्या पुढील ओळींची अनुभूती देणारी मैत्री हीच खरी मैत्री असते.....

*मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन्*
*तुझ्याशी बोलताना विसर पडलेला शीण*
*म्हणजे ...मैत्री..!*

              *शुभरात्री*
*✍ *सुनील अस्वले.*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
*mob* 8805835959,7219550629
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा