रविवार, १० डिसेंबर, २०१७

मैत्री

🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                     *सुचलेले काही.......*
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
                                            दि.09/12/2017
                             * *मैत्री*

माणसाच्या जीवनात आनंदाचे - दुःखाचे क्षण हे नात्यांतुन निर्माण होत असतात.आपले कुटूंब,नातेवाईक,समाज व मित्र-मैत्रिणी यांतील प्रत्येकाशी असणारे आपले नाते व त्या नात्यांत असलेला परस्पर स्नेह,विश्वास,आपुलकी ,श्रद्धा यांवर प्रत्येकाच्या जीवनातील आनंद नि दुःख अवलंबून राहते. जन्मत: प्राप्त व कालपरत्वे आपसूक जोडल्या गेलेल्या नात्यांतील माधुर्य नि कटूता या माणसाच्या मनावर अवलंबून असतात. *नाती ही खरेतर मना-मनाचे बंध असतात.* ती अतूट रहावीत नि त्यांतून जीवनानंद लाभावा हेच खरे आयुष्य जगणे असते.
           जन्मासोबत लाभलेल्या नात्यांसोबत जोडलेली नातीही आयुष्यात महत्त्वपूर्ण असतात.जीवनातील आनंद व दुःख या प्रसंगात ही आपसूक विचारांच्या ,मनाच्या पातळीवर जोडली गेलेली नाती महत्त्वाची ठरतात.या नात्यांत मैत्रीचे नाते अधिक जवळचे,विश्वासाचे नि गहीरे असते.मित्र ही माणसाच्या जीवनातील अशी बाब असते जिथे मनमोकळेपणाने आयुष्याची सर्व सुख-दुःख परस्परांशी विश्वासाने शेअर केली जातात. मित्र ही एक हळुवार भावना असते जिथे परस्परांबद्दल अतूट स्नेह,आपुलकी,काळजी असते. *मैत्रीच्या नात्यांतील ऋणानुबंध हे सूर्य व त्याच्या प्रकाशाइतके शाश्वत नि अबाधित असतात.*कोणत्याही कारणाने मैत्रीच्या नात्यास गैरसमजाचे ग्रहण लागले तरी ते क्षणिक ठरते.मित्राप्रती असणारा स्नेहरूपी प्रकाश या ग्रहणाच्या तमावर मात करतोच.
            *जीवनात लाभलेली खरी मैत्री ही जीवनाला लाभलेल्या श्वासाप्रमाणे की ज्याच्याशिवाय जीवन जीवन असू शकत नाही अशी असते.* अशा मैत्रीत कोणतेही बंधन नसते.मित्राबद्दलचा अतूट विश्वास व स्नेह हा या नात्याला लाभलेला परिसस्पर्श असतो.याच्या अस्तित्वाने ख-या मैत्रीचे सुवर्ण होते.काहीवेळा या सुवर्णास जरी तप्त झळा लागल्या तरी ती अधिकच झळाळून जाते. *आपला मित्र सदैव आनंदी असावा हीच एकमेव भावना मैत्रीच्या नात्यांमध्ये असते.*जीवनातील हरएक प्रसंगात मित्राची साथ अनिवार्य असते.प्रत्येकास आपल्या जीवनातील सुखाचे,दु:खाचे प्रत्येक क्षण प्रथम आपल्या मित्रासोबत शेअर करण्याची तीव्र ओढ असते.इथे मैत्रीतील भरवसा आनंदाचे क्षण अधिक आनंददायी करतो तर दुःखाची जीवनातील दाहकता कमी करतो. *आनंदी क्षणात पाठीवर शाबासकीची थाप देऊन कौतुकाचा वर्षाव करत जीवन अधिक उत्कृष्ट करणारे मित्राचे हात दुःखाच्या क्षणातही पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची प्रेरणा,बळ देतात.*
                मनुष्यास आपले जीवन अधिक सुंदर करायचे असेल तर जीवनात मैत्री असायलाच हवी. *मैत्री कोणी कोणाशी करावी याला बंधन नसावे पण मर्यादा जरूर असायला हवी.*आपल्या मैत्रीने आपल्या मित्रास त्रास होऊ नये याची काळजी मैत्री निभावताना परस्परांनी घेतली पाहिजे.आपल्या मनाप्रमाणे मित्राने वागावे ही भावना मैत्रीत असता कामा नये. *आपल्या वेळप्रसंगानुसार मैत्रीचा विसर पडता कामा नये.काही कारणांनी मैत्रीत दुरावा निर्माण झाला तरी किना-यावर येणा-या लाटेप्रमाणे पुन्हा पुन्हा परतून यावे.पण किना-याची साथ सोडू नये.*

*सर्वांना जीवनातील स्नेहमय,अतूट मैत्रीच्या शुभेच्छा!*

              *शुभदिन*
✍ *सुनील अस्वले.(सुवर्णविलास)*

sunilaswale80@gmail.com

*whatsapp* 9049211785
 
                                      
                                🙂
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁
           suvarnvilas.blogspot.com
🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁 🍁🍃🍂🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा